कर्जतः तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अतिवृष्टीने अनेक शेतजमिनी पाण्याखाली गेल्या, पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. नांदणी नदीवरील पूल वाहून गेल्यामुळे परिसराची वाहतूक बंद पडली. अनेक लहान-मोठ्या नद्यांना पूर आला असून, ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे.

कर्जतमध्ये गेल्या २४ तासांत १०३ मिमी पाऊस झाला. बर्गेवाडी येथील शेतकरी बापू धनवडे यांच्या शेतामध्ये विजेचा खांब कोसळल्याने मोठा अनर्थ टळला. विजेचा प्रवाह असताना मेंढ्यांचा कळप तेथून जाताना दोन मेंढ्या जागीच ठार झाल्या. मात्र, धनवडे यांच्या सतर्कतेमुळे ते स्वतः व इतर मेंढ्या बचावल्या. या अतिवृष्टीमुळे डाळिंब, केळी, कांदा यासारख्या फळबागा आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः कांद्याचे पीक व साठवण केलेला कांदा पूर्णतः भिजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रांताधिकारी नितीन पाटील व तहसीलदार बिराजदार यांच्या आदेशानुसार महसूल व कृषी विभागाने पंचनामे केले आहेत.शेतकरी बापूसाहेब नेटके म्हणाले, सलग दोन-तीन दिवस पडलेल्या पावसामुळे आमच्या फळबागा आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. विजेच्या खांबामुळे दोन मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. सरकारने नुकसान भरपाई जाहीर करावी.