अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री व भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. तसेच भाजपानं अंधेरी निवडणुकीतून माघार घ्यावी, असं आवाहन केलं. राज ठाकरेंच्या या पत्रावर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या. अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही राज ठाकरेंच्या या पत्रावर प्रतिक्रिया दिलीय. "राज ठाकरे यांच्या पत्राला काही अर्थ नाही. राज ठाकरेंचं ते मत असलं, तरी निवडणूक लढली पाहिजे," असं मत रामदास आठवलेंनी व्यक्त केलं. ते रविवारी (१६ ऑक्टोबर) नागपूरहून चंद्रपूरला जात असताना हिंगणघाट येथे कार्यक्रमासाठी गेले. तेथे ते बोलत होते. रामदास आठवले म्हणाले, "शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके आहेत. मात्र, त्या ठिकाणी भारतीय रिपब्लिकन पक्षाने (रिपाइं) भाजपाच्या मुरजी पटेल यांना पाठिंबा दिला आहे. मुरजी पटेल यांच्यासोबत दलित समाज मोठ्या संख्येने राहणार आहे. त्यामुळे अंधेरी पूर्वचा गड आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. चांगल्या फरकाने आमचा उमेदवार निवडून येईल." "राज ठाकरेंनी भाजपाने निवडणूक लढू नये असं पत्र लिहिलं. मात्र, त्याला काहीही अर्थ नाही. लोकशाहीत निवडणूक लढवणं आमचा अधिकार आहे. ते राज ठाकरेंचं मत असलं, तरी निवडणूक झाली पाहिजे, असं आमचं मत आहे. भाजपाने आपला उमेदवार उभा केला आहे आणि आरपीआयने त्याला पाठिंबा दिला आहे," असं मत रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. "आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्येही आरपीआयचा पाठिंबा भाजपाला राहणार आहे," असंही आठवलेंनी नमूद केलं. हेही वाचा : राज ठाकरे अंधेरी निवडणुकीत शिवसेनेला पाठिंबा देतील का? अरविंद सावंत म्हणाले, “मनसेने…” मातंग समाजाच्या आरक्षण मागणीवर आठवले म्हणाले, "मातंग समाजाच्या आरक्षणाची मागणी आहे. मात्र, त्याच्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. अशी मागणी अनेक जातींची आहे. त्यामुळे अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही."