ताकई येथील बोंबल्या विठोबाच्या जत्रेस प्रारंभ होऊन दहा दिवस झाले. पाच दिवसांनंतर जत्रा संपणार आहे. ५ कोटींची उलाढाल होणाऱ्या जत्रेवर महागाईमुळे विपरीत परिणाम होईल, असे बुजूर्गाचे मत होते. यात्रेकरूंनी हे मत गतवर्षीप्रमाणे यंदाही खोटे ठरविले आहे. महागाईवर मात करीत एकटय़ा सुकी मच्छीची सुमारे तीन कोटी रुपयांची विक्रमी विक्री झाल्याचे वृत्त आहे. उर्वरित काळात एक कोटी रुपयांच्या मच्छीची विक्री होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. रायगड जिल्ह्य़ातील शेतीच संपुष्टात आल्यामुळे व थंडीचे प्रमाण कमी कमी होत जात असल्यामुळे गतवर्षीप्रमाणे यंदाही म्हैस, बैल तसेच चादरी, घोंगडय़ा, बेडशीट, ब्लँकेट इत्यादीच्या विक्रीवर विपरीत परिणाम झालेला आढळून येत आहे.
पेण, अलिबाग, पनवेल येथील सुमारे २०० विक्रेते येथे अनेक वर्षांपासून सुकी मच्छीची विक्री करतात. कोळंबी सोडे, दांडी सुकट व लाल जवळा यांचे गतवर्षीचे विक्रीचे दर प्रति किलो अनुक्रमे ४५० ते ५०० रुपये, १८० ते २३० रुपये, १०० ते १३० रुपये होते. त्यामध्ये वाढ झालेली नाही, पण ऊर्वरित विविध प्रकारच्या मच्छीच्या दरात वाढ झाली आहे. पण त्याचा मच्छी विक्रीवर कोणताही परिणाम झालेला नाही, असे परळी-जांभूळपाडाचे विक्रेते प्रकाश आवासकर यांनी सांगितले. अलिबाग सोडेच्या दरात १०० टक्के वाढ झाली आहे. गतवर्षी ५०० ते ६०० रुपये किलो असलेले अलिबाग सोडे यावर्षी १००० ते १२०० रुपये किलो दराने विक्रीस उपलब्ध आहेत. खवय्यांचा त्याला उत्तम प्रतिसाद लाभत असल्याचा खुलासा त्यांनी केला. उर्वरित विविध प्रकारच्या मच्छीचे प्रति किलो विक्रीचे दर असे (कंसात- गतवर्षीचे प्रति किलो विक्रेचे दर- दर्शवितात) काळी वाकटी १६० ते २०० रु. (१२० ते १४० रु.), सफेद वाकटी २४० ते ३०० रु. (१५० ते १७० रु.), खारी मच्छी सुरमई ३०० ते ४०० रु. (२३० ते २५० रु.), टायगर सोडे ६०० ते ८०० रु. (५२५ ते ६०० रु.), पापलेट खारी मच्छी १०० रुपये नग (६० ते ८० रु. नग), रावस मच्छी- १८० ते २०० रु. (१४० ते १६० रु.), सफेद जवळा १८० ते २०० रु. (१६० ते १८० रु.), मांदेली मच्छी- १०० ते १२० रु. (६० ते ८० रु.), ढोंबी मच्छी १०० रु. (८० रुपये).
दरवर्षी सांगोला, पंढरपूर, चाकण परिसरातील खिल्लारी बैल, तर गुजरात राज्यातील म्हशींची जत्रेत मोठय़ा प्रमाणात विक्री होते. सरासरी १०० म्हशी व ५०० बैल विक्रीच्या नोंदी आढळतात, पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून म्हैस व बैलांच्या विक्रीवर फार मोठा परिणाम झाला आहे. खिल्लारी बैलाच्या जोडीचा दर ४० ते ५० हजार आहे. एका बैलाची विक्रीची किंमत २० ते २५ हजार आहे. गावठी बैलाचा विक्रीचा दर १० ते १५ हजार आहे. मेहसाणा म्हशीचा विक्रीचा दर गतवर्षी ४० ते ४५ हजार होता. तो यावर्षी ५० ते ५५ हजार झाला आहे. आजपर्यंत ४० गावठी व ६० खिल्लारी व १० म्हशींची विक्री झाल्याचे आढळून आले आहे. भविष्यात जत्रेतील गुरांचा बाजार बंद होण्याची शक्यता बुजूर्ग व्यक्त करताना आढळत आहेत.
घोंगडी, चादर, बेडशीट, ब्लँकेट विक्रीसाठी गेल्या तीन-चार वर्षांपासून ग्राहक लाभत नाहीत. जत्रेतील आतबट्टय़ाचा ठरणारा हा व्यवसाय बंद करण्याची वेळ येणार असल्याचे मूळचे पंढरपूरचे पण आजमितीस भायखळा येथे व्यवसाय करणारे विक्रेते दिलीप नारायण सादिल यांनी सांगितले. सोलापूरच्या पुलगम कंपनीच्या स्टँडर्ड चादरीच्या दरात नगाला ४० ते ५० रुपये वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. चादरीचा दर १७५ ते ४०० रुपये, घोंगडीचा दर १७५ ते ८०० रुपये, ब्लँकेटचा दर २०० ते ७०० रुपये व बेडशीटचा दर १५० ते २५० रुपये प्रती नग झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
जत्रेतील गाळ्यासाठी खोपोली नगरपालिका प्रशासनातर्फे पूर्वी १५ दिवसाला २०० ते २५० रुपये भुईभाडे आकारले जात होते. आता १००० ते १५०० रुपये अधिकृतपणे आकारले जातात. दरवर्षी त्याच ठिकाणी गाळा उपलब्ध करून देण्यासाठी अनधिकृतपणे रक्कम द्यावी लागते ती वेगळी, असे अनेक गाळाधारकांनी सांगितले. देवस्थान कमिटीकडून देणगीची पावती फाडली जाते. तो आकडापण भरमसाट असतो. पण त्याला सक्तीची न म्हणता खुशीखुशीची देणगी म्हणावे लागते. न.पा.कडून लाइट, पाणी, स्वच्छता पुरविण्यात येत असल्याचा दिंडोरा पिटण्यात येतो, पण ते अर्धसत्य असते. अनेक गाळेधारकांना पाणी मिळत नाही. गुंडांचा व चोरांचा त्रास सहन करावा लागतो. तक्रार करण्याची चोरी ठरते. संरक्षकांना वेगळी खुशीखुशीची देणगी द्यावीच लागते. एका टय़ुबलाइटसाठी प्रतिदिनी ९० रुपये भाडे द्यावे लागते. सिंगलफेजवरील असंख्य गाळेधारकांना उपलब्ध करून दिलेला विद्युतपुरवठा वारंवार खंडित होतो. धंद्याच्या वेळीच लाइट जातात, व्यवसायावर परिणाम होतो, पण कोणीही लक्ष देत नाहीत, अशी खंत अनेक गाळेधारकांनी व्यक्त केली. जत्रा काळातील गैरधंद्याबद्दल बोलता येत नाही. श्रद्धेपोटी वर्षोनवर्षे भरणाऱ्या हवश्या-गवश्या व नवश्यांच्या या विक्रमी उलाढालीच्या जत्रेत संबंधित यंत्रणेतील महाभाग आपले उखळ पांढरे करून घेतात. त्याकडे विठ्ठलाचे का लक्ष जात नाही, असा प्रश्न करताना असंख्य कष्टकरी गाळेधारक- हातगाडीवाले आढळत होते, हे मात्र तितकेच खरे!
संग्रहित लेख, दिनांक 7th Dec 2012 रोजी प्रकाशित
बोंबल्या विठोबाच्या जत्रेत सुकी मच्छीची विक्रमी उलाढाल
ताकई येथील बोंबल्या विठोबाच्या जत्रेस प्रारंभ होऊन दहा दिवस झाले. पाच दिवसांनंतर जत्रा संपणार आहे. ५ कोटींची उलाढाल होणाऱ्या जत्रेवर महागाईमुळे विपरीत परिणाम होईल, असे बुजूर्गाचे मत होते. यात्रेकरूंनी हे मत गतवर्षीप्रमाणे यंदाही खोटे ठरविले आहे.
First published on: 07-12-2012 at 05:10 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Record turnover of dry fish in bomblya vithoba fair