Sharad Pawar vs Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगाने निकाल दिल्यानंतर त्यावरून आरोप-प्रत्यारोप चालू झाले आहेत. यासंदर्भात शरद पवार गटाकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे अजित पवार गटाकडून या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी एक्सवर (ट्विटर) सविस्तर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीची तुलना थेट महाभारतामधील एका प्रसंगाशी केली आहे. त्यात त्यांनी दुर्योधन व अर्जुनाचाही उल्लेख केला आहे. दुर्योधन उशाशी, तर अर्जुन पायाशी! रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये कुरुक्षेत्रावरील युद्धाआधी दुर्योधन व अर्जुन श्रीकृष्णाला भेटायला गेले तेव्हाचा एक प्रसंग नमूद केला आहे. "महाभारतात घडलेल्या प्रसंगाप्रमाणेच आज राष्ट्रवादी काँग्रेसची स्थिती आहे", असं रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये सुरुवातीलाच म्हटलं आहे. "कुरुक्षेत्रावरील लढाईपूर्वी दुर्योधन आणि अर्जुन भगवान श्रीकृष्णाला भेटण्यासाठी गेले. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण झोपले असल्याने त्यांची झोप होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय या दोघांकडे पर्याय नव्हता. दुर्योधनाच्या मनात खच्चून अहंकार भरलेला असल्याने तो भगवान श्रीकृष्णाच्या पायाजवळ न बसता उशाजवळ बसला. पण अंगी कमालीची नम्रता असल्याने अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या पायाशी बसला. भगवान श्रीकृष्णाने झोपेतून डोळे उघडताच त्याला प्रथम पायाशी बसलेला अर्जुन दिसला आणि त्याला विचारलं तुला काय पाहिजे? तेव्हा अर्जुनाने सांगितलं तुमचं मार्गदर्शन आणि भगवान श्रीकृष्णाने त्याला होकार दिला", असं पोस्टमध्ये रोहित पवार यांनी नमूद केलं आहे. "अर्जुनानंतर श्रीकृष्णाची नजर उशाशी बसलेल्या दुर्योधनाकडे गेली असता त्यांनी त्यालाही विचारलं तुला काय हवंय? यावेळी अहंकाराने मदमस्त झालेल्या दुर्योधनाने विचार केला की एकट्या श्रीकृष्णाला आपल्या सोबत घेण्याऐवजी त्याची विराट नारायणी सेना घेतलेली कधीही फायदेशीर ठरेल. म्हणून स्वार्थी विचाराच्या दुर्योधनाने भगवान श्रीकृष्णाकडे त्यांची नारायणी सेना मागितली आणि भगवान श्रीकृष्णानेही ती दिली. अखेर एका बाजूला भगवान श्रीकृष्णाचं मार्गदर्शन लाभलेला अर्जुन तर दुसऱ्या बाजूला विराट नारायणी सेना सोबत असलेला दुर्योधन यांच्यात कुरुक्षेत्रावर झालेल्या तुंबळ युद्धात विजय हा अर्जुनाचाच झाला. कारण त्याच्या बाजूने साक्षात भगवान श्रीकृष्ण होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीतही आज हेच घडतंय", अशा शब्दांत रोहित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुलना महाभारतातील प्रसंगाशी केली आहे. “…तेव्हा फुटलेल्या आमदारांची घरवापसी होईल”, अनिल देशमुखांनी सांगितल्या शरद पवार गटातील पडद्यामागच्या हालचाली "श्रीकृष्णाने अर्जुनाला जसं मार्गदर्शन केलं…" "‘महाशक्ती’च्या माध्यमातून नारायणी सेना त्यांच्या बाजूने असली तरी श्रीकृष्णाने जसं अर्जुनाला मार्गदर्शन केलं, त्यातून प्रेरणा घेऊन शरद पवार आमच्यासोबत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय कुरुक्षेत्रावर महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आणि अहंकाराला गाडण्यासाठी लढतोय आणि शेवटी विजय आमचाच होणार", असा विश्वासही रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे. निवडणूक आयोगाचा काय आहे निकाल? निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात अजित पवार गटाच्या बाजूने निकाल दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ हे पक्षचिन्ह यावर अजित पवार गटाचा दावा आयोगाने मान्य केला. हा शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जात असला, तरी निकाल असा येणार याची कल्पना आधीपासून असल्याचं शरद पवार गटाकडून सांगितलं जात आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केल्याचंही बोललं जात आहे.