रविवारी नवी मुंबईतील खारघरमध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यानंतर उष्माघाताने ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. तसेच याचे तीव्र पडसाद राज्याच्या राजकीय वर्तुळातही उमटताना दिसत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार रोहित पवार यांनीही यावरून शिंदे सरकारला लक्ष्य केलं आहे. भर उन्हाळ्यात दुपारी कार्यक्रम घेण्याची काय गरज होती? असा सवाल यांनी सराकारला विचारला आहे. ट्वीट करत त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – VIDEO : “अमित शाहांना वेळ नसल्याने जर…”, उष्माघातामुळे ११ जणांच्या मृत्यूनंतर उद्धव ठाकरेंची टीका

नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

“खारघरमध्ये ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला भर उन्हात बसलेल्या नागरिकांपैकी ८ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे. या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि अत्यवस्थ असलेले नागरीक लवकर बरे व्हावेत, ही प्रार्थना करतो”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली.

“या घटनेला राज्य सरकार जबाबदार”

पुढे बोलाताना त्यांनी या घटनेवरून शिंदे सरकारला लक्ष्य केलं. ते म्हणाले, “या घटनेच्या निमित्ताने एक प्रश्न पडतो, की ऐन उन्हाळ्यात भर दुपारी एवढा मोठा कार्यक्रम घेण्याची गरज होती का? हे टाळता आलं नसतं का? मुळात राजकीय शक्ती प्रदर्शनाची हौस टाळली असती, तर एका चांगल्या कार्यक्रमाला आज गालबोट लागलं नसतं आणि निष्पाप बळी गेले नसते. हा पूर्णतः सरकारचा बेजबाबदारपणा आहे”

हेही वाचा – Video: महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघातानं ११ जणांचा मृत्यू, अजित पवारांनी सांगितली नेमकी चूक; म्हणाले, “…हेच आयोजकांचं चुकलं!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमकं काय प्रकरण?

रविवारी नवी मुंबईतील खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्याला लाखोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. मात्र, या पुरस्कार सोहळ्यानंतर अनेकांना उष्माघाताची समस्या जाणवली. काहीजण चक्कर येऊन पडले, तर अनेकांना उलटीचा त्रास झाला. यापैकी ११ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, मृतांच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच रुग्णालयात उपचार घेत असेल्यांचा खर्चही राज्य सरकार करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.