पश्चिम घाट अभ्यास समितीच्या कस्तुरीरंजन समितीने सावंतवाडी शहराला इको सेन्सेटिव्ह करण्याचे नमूद केले आहे. तसे झाल्यास सावंतवाडी शहराच्या विकासावर मोठा परिणाम होणार असल्याने इको सेन्सेटिव्हमधून सावंतवाडी शहर वगळावे असा ठराव नगर परिषद सभेत घेण्यात आला. नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा झाली.
सावंतवाडी नगरपालिकेने घरपट्टी ९४ टक्के व पाणीपट्टी ९५ टक्के वसुली केली असल्याने कर्मचारी व नागरिकांचे आभार नगराध्यक्ष बबन साळगांवकर व उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी मांडले.
सावंतवाडी शहराच्या विकासात घातक ठरणारा इको सेन्सेटिव्हमधून शहराला वगळावे असा ठराव नगराध्यक्ष साळगावकर यांनी मांडला. उपनगराध्यक्ष राजन पोकळे म्हणाले, पर्यटन शहर म्हणून सावंतवाडीचा नावलौकिक होत असून शहरवासीय पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. त्यामुळे शहराला इको सेन्सेटिव्ह म्हणून वगळावे असे म्हणाले. यावेळी विलास जाधव, उमाकांत वारंग, विलासिनी पटेकर यांनी भूमिका मांडली.
पावसाचा हंगाम तोंडावर आला आहे. सावंतवाडी शहरात जुनाट वृक्षाच्या कोसळण्याने मोठे नुकसान होत आहे. अनेक झाडे मुळावर ढोली बनून कोसळण्याच्या मार्गावर आहेत. त्याबाबत तातडीने निर्णय घेऊन जीर्ण झाडांची तोड करावी अशी मागणी अ‍ॅड. सुभाष पणदूरकर यांनी करून फोटो सादर केले.
सावंतवाडी शहरात आठ महिन्यापूर्वी रस्ते कामाची वर्क ऑर्डर देऊनही ठेकेदाराने कामच सुरू केले नाही, म्हणून राजू बेग यांनी नाराजी व्यक्त करत ठेकेदाराच्या अशा कृतीमुळे नगरसेवकावर लोक नाराज आहेत. त्याची चौकशी करून मक्तेदाराला काळ्या यादीत टाका असे बेग म्हणाले. त्यावर नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी मुख्याधिकाऱ्यानी ठेकेदारांची बैठक आयोजित करून सक्त सूचना द्याव्यात, अन्यथा पुढील बैठकीत निर्णय घेऊ असे निर्देश दिले.
सावंतवाडी शहरातील खड्डे बुजविण्याचा मक्ता ठेकेदाराला देण्यात आला. पण या ठेकेदाराने सर्वच खड्डे बुजविले नाहीत. गेल्या आठ महिन्यात खड्डे बुजविले नसल्याने नगरसेवकाबाबत लोकांत नाराजी आहे याकडे विलास जाधव यांनी लक्ष वेधून अशा ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. राजू बेग यांनीही ठेकेदारामुळे नगरसेवक बदनाम होत असतील तर काळजी घ्यावी असे सुचविले. त्यावर नगराध्यक्ष साळगांवकर यांनी आपण मुख्याधिकारी यांच्याशी बोलतो असे सांगितले.
सावंतवाडी शहरातील विहिरींची स्वच्छता व गाळ काढण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नगराध्यक्षांचे अभिनंदन विलास जाधव यांनी केले. सावंतवाडी शाळा नं.४, अ‍ॅड. नार्वेकर घर व परिसरातील चार रस्त्यांची कामे मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला.
अग्निशामक बंब शहराबाहेर नको
सावंतवाडी नगरपालिकेचा अग्निशामक बंब जंगलाचा अग्नीप्रलय विझविण्यासाठी दूरवर जातो. त्याच काळात सावंतवाडी शहरावर काही दुर्दैवी प्रकार कोसळला तर काय करणार? असा प्रश्न गोविंद वाडकर यांनी उपस्थित करून अग्निशमक बंब ग्रामीण भागात जंगलाची आग विझविण्यासाठी नेला जाऊ नये असे सुचवून जीवित हानी किंवा कर्मचाऱ्यांच्या जिवास होणारा धोका टाळावा, असे सुचविले.
राजू बेग यांनी जंगलाच्या आगी विझविण्यास बंब दिला जाऊ नये असे सुचविले. यावेळी नगराध्यक्ष बबन साळगांवकर म्हणाले, सावंतवाडी शहराच्या आसपास पाच किलोमीटपर्यंत प्रॉपर्टीला आग लागली तर बंब दिला जावा या मताचे आम्ही आहोत, असे पोलिसांना कळविले जाईल. शहराच्या सुरक्षितेसाठी हा निर्णय घेताना सर्वानी बसून धोरण ठरवू या असे साळगांवकर म्हणाले.
अग्निशामक बंबाने शहराची सुरक्षा राबवताना शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर बंब दिला जावा. मात्र जंगलात बंब गेल्यास त्याची जबाबदारी कोणी घ्यावी असा प्रश्न उपस्थित करून नगराध्यक्ष साळगांवकर यांनी पोलिसांना तसे कळविण्यास सांगितले.
यावेळी साक्षी कुडतरकर, कीर्ती बोंद्रे, योगिता मिशाळ, शुभांगी सुकी, सुधन आरेकर आदींनी चर्चेत भाग घेतला.