संगमनेरः तालुक्यातील साकूर या गावचे विभाजन करण्यात आले असून, त्यातून जांभूळवाडी ही नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्यात आली आहे. जांभुळवाडीचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण करण्याची नागरिकांची मागणी होती. या मागणीची दखल घेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली जांभुळवाडी गावाचे स्वतंत्र महसुली गावात रुपांतरण केल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली आहे. याची अधिसूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी प्रसिद्ध केली.
या निर्णयामुळे जांभुळवाडी या गावाला स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा मिळणार आहे. जांभुळवाडी हद्दीतील साकूरमध्ये समाविष्ट भूमापन क्रमांक वगळून नव्याने जांभुळवाडीमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत. या निर्णयाचे स्वागत होत असून, प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्याने पठारभागाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर, बुवाजी खेमनर, गुलाब भोसले, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य रऊफ शेख, मच्छिंद्र खेमनर, युवराज खेमनर, नागेश कोळेकर आदींनी आमदार खताळ व मंत्री विखे यांचे आभार मानले आहेत.