कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात जवळपास गेल्या तीन महिन्यांपासून तुरुंगात असलेले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर त्यांची आज तुरुंगातून सुटका झाली आहे. संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर सातत्याने संजय राऊतांनी जामिनासाठी अर्ज केले होते. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे अर्ज फेटाळण्यात आले होते. त्यामुळे संजय राऊतांची दसरा-दिवाळीही तुरुंगातच गेली. आता अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. संजय राऊत यांना ३१ जुलै २०२२ रोजी अटक करण्यात आली होती. त्यांच्यासह त्यांचे सहकारी प्रविण राऊत यांनाही जामीन मंजूर करण्यात आला आहे.

हेही वाचा – “सावधान रहो शेर आ रहा है…”; संजय राऊतांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर भास्कर जाधवांचा विरोधकांना इशारा!

पण, संजय राऊत यांच्या जामिनाला अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) न्यायालयात विरोध केला होता. त्यानंतर ईडीला मोठा धक्का बसला आहे. न्यायालयाने ईडीची मागणी फेटाळली आहे. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ट्वीटद्वारे निशाणा साधला आहे.

हेही वाचा – अब्दुल सत्तार, गुलाबराव पाटील आणि रविंद्र चव्हाणांचा तातडीने राजीनामा घ्या, अन्यथा…; विद्या चव्हाणांचा शिंदे-फडणवीस सरकारला इशारा!

“ईडीचा बेकायदेशीर कारभार, तोंडावर आपटले जोरदार. संजय राऊतांची अटक बेकायदेशीर म्हणून PMLA कोर्टाने ‘ईडी’ला झापलं! यामुळे शासकीय यंत्रणेचा दबाव आणून काम करणाऱ्या ‘ईडी’चा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे.” असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊतांना अटक केल्यानंतर आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी पीएमएलए न्यायालयासमोर सुनावणी सुरू होती. या सुनावणीदरम्यान तपास यंत्रणांचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊतांकडून करण्यात आला. मात्र, राऊत हे या प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचा ठपका ईडीकडून ठेवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आता राऊतांच्या जामिनाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची तयारी ईडीकडून केली जात असल्याचं सांगितलं जात आहे.