भारतीय रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांची नोट वितरणातून काढून टाकली. यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी देशात नोटबंदी जाहीर केली होती. देशातल्या ५०० आणि १,००० रुपयांच्या चलनी नोटा त्या दिवसापासून व्यवहारातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर केंद्र सरकारने ५०० आणि २,००० रुपयांच्या दोन नवीन चलनी नोटा बाजारात आणल्या होत्या. यापैकी २,००० रुपयांची नोट आता बंद करण्यात आली आहे. काळा पैसे देशात परत आणण्यासाठी, दहशतवाद्यांना पुरवला जाणारा काळा पैसा थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१६ मध्ये नोटबंदी जाहीर केली होती. परंतु केंद्र सरकारने दावा केल्यानुसार कोणत्याही प्रकारचा काळा पैसा भारतात आल्याचे पुरावे सापडलेले नाहीत. त्यावरुन विरोधक सातत्याने केंद्र सरकारवर टीका करतात. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील आता थेंट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. संजय राऊत सध्या बीड दौऱ्यावर आहे. परळी येथील वेद्यनाथाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बातचित केली. यावेळी पत्रकारांनी राऊत यांना विचारलं, नोटबंदीवर आणि पंतप्रधान मोदी नोटबंदी करताना म्हणाले होते की, नोटबंदी यशस्वी झाली नाही तर भर चौकात फाशी द्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्याल. यावर संजय राऊत म्हणाले, आता त्यांच्यासाठी चौकाचौकात लोकांनी फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे. हे ही वाचा >> “घुसमट होत असेल तर पंकजाताईंनी…”, परळीतून संजय राऊतांचा पंकजा मुंडेंना सल्ला संजय राऊत म्हणाले, नागरिकांनी पंतप्रधानांची इच्छा पूर्ण केली पाहिजे. चौकाचौकात फाशीचा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, किंवा त्यांनी स्वतःच वधस्तंभाकडे जायला पाहिजे. आपण किती लोकांचं नुकसान केलं, अर्थव्यवस्थेचं किती नुकसान केलं, महागाई वाढवली, बेरोजगारी वाढवली, व्यापार, मोठे उद्योग, लहान उद्येग बंद पाडले याचा विचार करायला हवा. त्यांनी नोटबंदी करताना पहिली घोषणा काय केली होती, तर परदेशातून काळा पैसा भारतात परत येईल. एक रुपया तरी आला का? ते म्हणाले होते अतिरेक्यांना काळ्या पैशाचा पुरवठा होतो तो बंद होईल. काश्मीरमध्ये जाऊन बघा म्हणावं त्यांना.