Sanjay Raut on Pahalgam Terror Attack : “काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा”, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केली आहे. यावेळी राऊत यांनी दोन उदाहरणे दिली. “दिल्लीत बॉम्बस्फोट झाले तेव्हा शिवराज पाटील यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला (२६ नोव्हेंबर २००८) तेव्हा महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी राजीनामा दिला होता”, असं राऊत म्हणाले.
शिवसेनेचे (ठाकरे) खासदार म्हणाले, “पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा देशात भाजपाचं सरकार होतं. आता पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला असून अमित शाह हे गृहमंत्री आहेत. लोकभावनेचा आदर करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांचा राजीनामा घ्यायला हवा. दिल्लीत बॉम्बस्फोट झाले तेव्हा काँग्रेसने तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांचा राजीनामा घेतला होता. शरद पवारही त्या सरकारमध्ये मंत्री होते.”
…त्यांनी अमित शाहांचं समर्थन करू नये : संजय राऊत
संजय राऊत म्हणाले, “काही लोक आता अमित शाहांचा राजीनामा नको म्हणतायत, मग महाराष्ट्रात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा राजीनामा घेतला होता ते विसरू नका. काँग्रेसने देखील त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा राजीनामा घेतला होता. माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचे संदर्भ आहेत. मी इतिहासाला धरून बोलतोय. ज्यांनी आर. आर. पाटलांचा राजीनामा घेतला. ज्यांनी गरज नसताना विलासराव देशमुखांना राजीनामा द्यायला लावला, त्यांनी अमित शाह यांचं समर्थन करू नये.”
आता अमित शाह राजीनामा देतील का? राऊतांचा प्रश्न
राज्यसभेचे खासदार संजय राऊत म्हणाले, “सध्याच्या परिस्थितीत भारत आपल्या शत्रूविरोधात जी काही कारवाई करेल त्यात आम्ही सरकारबरोबर आहोत. मात्र, आम्ही या सरकारच्या चुकांबरोबर नाही. सरकारच्या चुकांबद्दल कोणी बोलायचंच नाही का? शिवराज पाटील गृहमंत्री असताना दिल्लीत बॉम्बस्फोट झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला होता. दिल्लीत जे काही घडलं त्याची जबाबदारी पाटलांनी घेतली होती. काँग्रेसने त्यांचा राजीनामा घेतला. आता अमित शाह राजीनामा देतील का?”