उद्धव ठाकरे गटातील नेते तथा खासदार संजय राऊत हे पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी मागील काही दिवसांपासून तुरुंगात होते. साधारण १०० दिवसांनी ते जामिनावर बाहेर आले आहेत. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी राज्यातील सरकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, असा खोचक टोला लगावला. तसेच राऊत यांनी फडणवीस यांचे कौतूकही केले आहे. लवकरच मी फडणवीसांची भेट घेणार आहे, असे राऊत म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> संजय राऊत घेणार उद्धव ठाकरे, शरद पवारांची भेट, आगामी राजकीय रणनीतीवर चर्चा होणार?

“राज्यात सध्या नव्या सरकारची स्थापना करण्यात आली आहे. या नव्या सरकारने काही चांगले निर्णय घेतलेले आहेत. त्याचे मी स्वागत करतो. आम्ही विरोधासाठी विरोध करणार नाही. ज्या गोष्टी जनता, राज्य तसेच देशासाठी योग्य असतात, त्याचे नेहमीच स्वागत केले पाहिजे. राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी काही चांगले निर्णय घेतले आहेत. तुरुंगात असताना मी वर्तमानपत्रात हे वाचायचो. गरिबांना घर देण्याचा निर्णय, म्हाडाला अधिकार बहाल करण्याचा निर्णय, असे चांगले निर्णय घेण्यात आले आहेत,” असे कौतुकोद्गार राऊत यांनी काढले.

हेही वाचा >>>“औरंंगजेब, अफजलखानाच्या कबरी उद्ध्वस्त कराव्यात, अन्यथा…” हिंदू महासंघाचा राज्य सरकारला इशारा

“मी आगामी दोन ते चार दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. मला वाटतं की राज्यातील कारभार उपमुख्यमंत्री चावलत आहेत. त्यांच्याच नेतृत्वात राज्य सरकारचा कारभार चालतोय. राज्यातील महत्त्वाचे निर्णय तेच जाहीर करतात,” असेही संजय राऊत म्हणाले.

पाहा व्हिडीओ –

राज ठाकरे यांच्यावर टीका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही टीका केली आहे. “मनसे प्रमुख आणि माझे मित्र राज ठाकरे यांनी एका ठिकाणी बोलताना माझ्यावर टीका केली होती. संजय राऊतांवर आता ईडीने कारवाई सुरू केली आहे. त्यांनी आता एकांतात बोलण्याची सवय लाऊन घ्यावी, असे ते म्हणाले होते. मात्र, मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, की मी कारागृहात एकांतात होतो. वीर सावरकरही तुरुंगात असताना एकांतात होते. लोकमान्य टिळक तसेच आणीबाणीच्या काळात अनेक नेते एकांतात होते. तशीच माझी अटकही राजकीय होती आणि मी माझा एकांतातला काळ सत्कर्मी लावला आहे”, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.