मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या दिनानिमित्त शनिवारी ( १६ सप्टेंबर ) संभाजीनगर येथे मंत्रीमंडळाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पूर्ण मंत्रीमंडळ आणि अधिकारीवर्ग संभाजीनगरमध्ये उपस्थित असणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री शिंदे पत्रकार परिषदेला संबोधित करणार आहेत. जर, संधी मिळाली तर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राहू, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

संजय राऊत म्हणाले, “२०१६ देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना संभाजीनगरमध्ये कॅबिनेटची बैठक घेण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी ५० हजार कोटींच्या घोषणा केल्या होत्या. २०१६ सालच्या योजनांचा पत्ता नाही. पण, ज्यांनी मुख्यमंत्री म्हणून घोषणा केल्यात ते उपमुख्यमंत्री म्हणून येत आहेत. एवढाच काय तो फरक. बाकी सगळा मराठवाडा जसाच्या तसा आहे.””हे खोटारडं सरकार आहे. आता सरकार ४० हजार कोटींचं पॅकेज जाहीर करणार

असल्याचं वाचलं. पण, सरकारच्या तिजोरीत पैसे आहेत का? मुळात सरकार बेकायदेशीर आहे. एक पैसाही खर्च करण्याचा अधिकार सरकारला नाही. तुम्हाला अधिकार काय आहे? आजचं मरण उद्यावर ढकलत आहात,” अशी टीका संजय राऊत शिंदे सरकारवर केली आहे.

हेही वाचा : “राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचं निवडणूक आयोगाला सांगितलं होतं, पण…”, जयंत पाटलांची टीका

“भाजपा देशात राजकारणाशिवाय काही करते का? भाजपाला फक्त निवडणुका लढवण्याचं व्यसन जडलं आहे. बाकी विकास, रोजगार, शिक्षण, पाणी, राष्ट्रीय सुरक्षा याविषयावर भाजपा कुठं बोलते? काश्मीरमधील ३७० कलम हटवले आहे. तरी, तिथे जवान मरत आहेत. यावर भाजपा कुठंच बोलत नाही,” असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : “यशोमती ठाकूरांनी रवी राणांकडून कडक नोटा घेतल्या”, नवनीत राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले…

“मंत्रीमंडळ बैठकीसाठी आम्ही संभाजीनगरमध्ये थांबलो आहे. बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर आम्हीही संवाद साधू. तुम्ही किती खोटं बोलता हे ऐकायचं आहे. आम्हाला संधी मिळाली तर पत्रकार परिषदेला हजर राहू. आम्ही सगळे पत्रकार आहोत. पोलिसांनी अडवलं नाही, तर पत्रकार परिषदेला नक्की जाऊ,” असेही संजय राऊत यांनी सांगितलं.