दर महिन्याला लागतो संत गोराजी यांचा लंगर उस्मानाबाद : भागवत धर्माची पताका देशभरात पोहोचविण्यात संत नामदेव महाराज यांचे योगदान शब्दातीत आहे. त्यामुळेच उत्तर भारतात तत्कालीन महाराष्ट्र देशातील नामदेव महाराजांना पूज्य मानले गेले. घुमान येथील बाबा नामदेव यांचा गुरुद्वारा त्याचे जिवंत द्योतक आहे. नामदेव महाराज यांच्यानंतर तेर येथील संतश्रेष्ठ गोरोबा (काका) कुंभार यांचीही ख्याती आता उत्तर भारतात चांगलीच वाढू लागली आहे. जम्मू शहरात आजपासून ३४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या संत गोराजी कुंभार यांच्या मंदिराला आता हजारो भाविक नित्य भेट देत आहेत. महिन्याच्या पहिल्या रविवारी या मंदिरात भाविकांसाठी लंगरदेखील लागतो. जम्मू शहरातील इंदिरा गांधी चौकातील गोराजी कुंभार यांचे मंदिर आता देशभरातील पर्यटकांच्या पसंतीचे ठिकाण म्हणून हळूहळू उजेडात येऊ लागले आहे. संत गोरोबा काकांच्या या भक्तिस्थळाला झळाळी देण्यासाठी जम्मू सरकारने मागील वर्षी ५१ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. भाविकांच्या निवासाच्या सोयीसह अद्ययावत असलेले हे मंदिर पुढील काळात पाचमजली करणार असल्याचे मंदिर संस्थानचे जनरल सेक्रेटरी सतीशचंद फतीय यांनी सांगितले. जम्मू शहरात प्रजापती कुंभार समाज लक्षवेधी संख्येने वास्तव्यास आहे. समाजाचे संघटन मोठे आहे. त्यातून त्यांना समाजाच्या संघटनाला चालना देण्यासाठी एक मंदिर निर्माण करण्याची कल्पना सुचली. महाराष्ट्रात संत नामदेव यांचे समकालीन असलेले संत गोरोबा कुंभार होऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली. व्यवसायाने अभियंता असलेले समाजाच्या सोसायटीचे अध्यक्ष अयोध्याकुमार मनावा यांनी पुढाकार घेतला. उत्स्फूर्तपणे अनेकांनी आर्थिक हातभार लावला आणि जानेवारी १९८६ साली जम्मू शहरात पहिल्यांदा या मंदिराच्या माध्यमातून संत गोराजी कुंभार यांची प्रत्यक्ष ख्याती पोहोचली. मूर्तीला आकार आला. चिखल तुडवत असताना विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या गोरोबा काकांच्या मूर्तीला आता नित्यनेमाने भजले जात आहे. दरवर्षी युवा संमेलन, नारी संमेलन आणि समाजाचे वार्षिक संमेलन असे तीन मोठे कार्यक्रम या मंदिरात साजरे केले जातात. २७ फेब्रुवारी हा मंदिराच्या वार्षिक संमेलनाचा दिवस आहे. या दिवशी हजारो भाविकांसाठी येथे लंगर पेटविला जातो. दिवसभरात किमान चारशे किलो तांदूळ शिजवला जात असल्याचे फतीय सांगतात. जम्मूत प्रशस्त मंदिर साडेचार हजार चौरस फूट जागेवर हे मंदिर साकारण्यात आलेले आहे. मंदिरात सध्या पाच खोल्या, स्नानगृह, स्वच्छतागृह आणि सुसज्ज असे भव्य सभागृह आहे. बाहेरून आलेल्या भाविकांच्या निवासाची आणि भोजनाची व्यवस्था येथे चोख केली जाते. राज्य सरकारने हा भूखंड खास गोराजी कुंभार यांचे मंदिर साकारण्यासाठी निशुल्क दिला असल्याचेही सतीशचंद यांनी नमूद केले. महाराष्ट्रातून भाविक आल्यानंतर साक्षात गोराजी कुंभार यांचे दर्शन झाल्याचा आनंद मिळत असल्याची भावना येथील कार्यकत्रे व्यक्त करतात.