कराड : साडेपाच- सहा महिन्यांच्या प्रदीर्घ पावसानंतर कडाक्याची थंडी पडणार, हे नक्की असताना, सातारा जिल्ह्यात सलग चार- पाच दिवसांपासून थंडी वाढत चालली आहे. विशेषतः रिकाम्या शेतात, शिवारं आणि नद्यांकाठी थंडीचा चांगलाच कडाका जाणवत आहे.
पहाटेच्या सुमारास थंडगार वाऱ्यांच्या लहरी आणि दाट धुकेही सर्वदूर पसरू लागले आहे. दिवसाही हवेत गारठा राहात असून, संध्याकाळपासून कडाक्याची थंडी सुरू होत आहे. त्यामुळे कुडकुडणाऱ्या जीवांना उबदार कपड्यांचा पेहराव करावा लागत आहे. गारवा वाढत चालल्याने पिकांवर दहिवर (दवबिंदू) पडत आहे. त्यामुळे शेतीची कामे रखडताना, लांबलेल्या रब्बीचा पेरा पिछाडीवर पडणार आहे. या थंडीचा आणि दवबिंदूंची चादर उभ्या पिकांना फटका देत आहे.
तापमान १६ अंश
हवामान खात्याच्या माहितीनुसार, तापमानात घट होत असून, किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. दिवसा गारवा असून, सकाळ- संध्याकाळ थंडीचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे अबालवृद्धांनी आता कानटोपी, हातमोजे, सॉक्स, स्वेटर, शाल, जॅकेट अशी शरीराला ऊब देणारी कपडे वापरण्यास सुरुवात केली आहे. चहा, कॉफी अशा उष्ण पेयांची मागणी वाढली आहे. चहा, कॉफीची दालने लोकांनी सतत भरल्याचे दिसून येत आहे.
ऊस तोडकऱ्यांचे हाल
मान्सूनपूर्व, मान्सून अन् मान्सुनेत्तर अशा साडेपाच- सहा महिन्यांच्या प्रदीर्घ पावसामुळे जसे खरिपाचे गणित बिघडवले, जवळपास तशीच स्थिती रब्बी हंगामाचीही झाली आहे. पावसाळा लांबल्याने रब्बीचा पेराही लांबला. थंडीचे आगमनही महिना- सव्वा महिन्याच्या विलंबाने झाल्याने याचा स्वाभाविकपणे रब्बीच्या पेऱ्यावरही परिणाम झाला आहे.
पावसाच्या सरतेशेवटी उसतोडकऱ्यांचे प्रचंड हाल झाले. त्यांच्या पालाच्या झोपड्या पावसाच्या पाण्यात गेल्या. सध्याच्या वाढत्या थंडीमुळे या ऊस तोडणी कामगारांचे, त्यांच्या मुलाबाळांचे हाल होत आहेत. सखल भागातील ऊस क्षेत्रातील ओलावा अजूनही हटलेला नसताना, अशा ठिकाणी ऊसतोड मिळाल्याने व चारही बाजूंनी गारठून गेल्याने ऊसतोडीला वेग मिळत नसून, त्याचा साखर कारखान्यांच्या गाळपावरही विपरीत परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
