लोकसत्ता विशेष प्रतिनिधी अलिबाग: महाड येथील सावित्री नदीतील उर्वरीत गाळ काढण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. यासाठी ३० कोटींचा निधी शासनाने उपलब्ध करून दिला आहे. जलसंपदा विभागामार्फत गेल्या वर्षी सावित्री, काळ, गांधारी, भावे नदीपात्रातील गाळ काढण्याचे काम सुरु करण्यात आले होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने गाळाचे सर्वेक्षणही केले होते. यात नद्यामध्ये अंदाजे २६ लाख ५० हजार घनमीटर गाळ साचला असल्याचे समोर आले होते. यापैकी १० लाख ५ हजार घनमीटर गाळ काढण्यात प्रशासकीय यंत्रणांना यश आले होते. अद्यापही १५ लाख ९१ हजार घनमीटर गाळ नदी पात्रात शिल्लक आहे. म्हणजेच गेल्या वर्षी जवळपास ४० टक्के गाळ काढण्यात आला होता. सिआरझेड परवानगी मिळण्यास उशीर झाल्याने आणि नंतर पावसाला सुरवात झाल्याने हे काम थांबविण्यात आले होते. आता उर्वरीत ६० टक्के गाळ काढण्याच्या कामाला पुन्हा एकदा सुरवात झाली असून दोन पोखलेन आणि १० डंपरच्या मदतीने गाळ उपसा करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. नदी पात्रातील गाळ काढण्याचे काम लवकर सुरु व्हावे अशी मागणी महाडकरांनी केली होती, यानंतर शासनाने या कामासाठी ३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. नदीपात्रातील गाळाची बेटे हटविल्यामुळे महाडची पूर समस्या बऱ्याच प्रमाणात निकालात निघेल असा विश्वास व्यक्त केला जातो आहे.