शहरात सीरियल किलर खून प्रकरणाची धास्ती असताना बुधवारी एका महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले. डोक्यात घाव घालून हा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.  या प्रकारातील हा ११ वा बळी आहे. विशेष म्हणजे शहरात पोलिसांची कडक गस्त सुरू असतानाही हा प्रकार होत असल्याने शहरवासीयांत दहशत निर्माण झाली आहे.
यातील पाच खून हे रेल्वे स्थानक परिसरामध्ये झालेअसून ते सर्व पुरुषांचे होते. उर्वरित खून हे शहराच्या अन्य भागात झाले आहे. खून झालेल्या व्यक्ती बहुतांश भिकारी असल्याने सध्या पोलिसांसमोर ही नवीनच समस्या निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून बेवारस मृतदेह मिळण्याचे प्रमाण वाढत असून पोलिसांनी त्यादृष्टीने सर्वत्र तपासणी मोहीम सुरू केली आहे.  
सध्या शहरात असणाऱ्या अन्य भिकाऱ्यांना अन्यत्र पिटाळण्याचे कामही करण्यात येत आहे. एकापाठोपाठ एक खून पडत असल्याने नागरिकांमध्येही पोलीसाच्या कार्यक्षमतेविरुध्द प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.  पोलिसांच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत केवळ पाच जणांचेच खून झाले असून अन्य सहा बेवारस मृतदेह सापडले आहेत.
विशेष पथकाकरवी चौकशी
दरम्यान  शहरातील सीरियल किलर प्रकाराच्या खून प्रकरणाची नोंद राज्य प्रशासनाने घेतली आहे. गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी या प्रकरणाचा तपास विशेष पथकाद्वारे करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलीस अधीक्षक विजयसिंह जाधव यांनी बुधवारी ही माहिती पत्रकारांना दिली. प्रजासत्ताक संघटनेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनी पंधरा दिवसांपूर्वीच या प्रकरणाचा तपास गुप्तचर खात्याकडे सोपवावा अशी मागणी केली होती.