लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. अशात रविवारपासून अजित पवार गटातले त्यांचे जवळचे सहकारी निलेश लंके हे शरद पवार गटात परततील अशा चर्चा रंगल्या होत्या. याबाबत पुण्यातील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता शरद पवारांनी थोडक्यात उत्तर दिलं आहे. निलेश लंके तुमच्याबरोबर येणार अशा चर्चा आहेत. निलेश लंके तुमच्याबरोबर आले की तुम्ही अहमदनगरमधून त्यांना लोकसभा निवडणुकीचं तिकिट देणार का? असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर शरद पवारांनी उत्तर दिलं आहे. काय म्हणाले शरद पवार? “या देशातील एजन्सींचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांसाठी यापूर्वी फारसा कधी झाला नाही. सध्याच्या घडीला ईडी, सीबीआय इतर एजन्सींचा वापर ठिकठिकाणी गैरवापर केला जातो आहे. कर्नाटकमध्ये एका वरिष्ठ माणसाच्या संदर्भात कारवाई झाली. अटक करण्यात आली. डी. के. शिवकुमार यांना न्यायालयाने निर्दोष सोडलं. एखाद्या राज्यातला इतका वरिष्ठ नेता त्याला अटक करणं, कोर्टाने त्याला सोडणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ईडीचा गैरवापर केला जातो. " हे पण वाचा- “ईडी संस्था भाजपाचा सहकारी पक्ष असल्यासारखी वागते आहे, कारण..”; शरद पवारांचा मोदींवर गंभीर आरोप रोहित पवारांवरची कारवाई योग्य नाही रोहित पवार यांना दोन ते तीन दिवसांत चौकशीसाठी बोलवलं गेलं आणि त्यांच्या संस्थेची जप्ती करणं आणि कारवाई सुरु करणं हे दिसतं आहे. त्यांच्यावरचा आरोप असा आहे की ते साखर कारखाना विकत घेतानाचं त्यांचं टेंडर मोठं होतं. आता बँकेने विकलेल्या कारखान्यांची यादी पाहिली तर ते २५ कोटींच्या आत साखर कारखाने विकले गेले तिथे कारवाई नाही. ५४ कोटीला कारखाना गेल्यावर चौकशी सुरु झाली. दहशत निर्माण करणं, सक्रिय कार्यकर्त्याला थांबवणं हे यामागे दिसतं आहे.” असं शरद पवार म्हणाले. निलेश लंकेंबाबत काय म्हणाले शरद पवार? निलेश लंके पुन्हा तुमच्या बाजूला येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत काय सांगाल? त्यांचा पक्ष प्रवेश आज होणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा, "या चर्चेला काही अर्थ नाही. निलेश लंकेंबाबत मला ठाऊक नाही. ही चर्चा मी तुमच्याकडूनच ऐकली आहे. असे अनेक लोक आहेत. त्यांना सगळ्यांना विचारत बसणार का?" असं शरद पवार म्हणाले.