Buldhana Accident : बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसचा भीषण अपघात होऊन २५ लोकांचा मृत्यू झाला. संपूर्ण महाराष्ट्र या घटनेमुळे हळहळला आहे. या ठिकाणी जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणीही केली. तसंच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदतही जाहीर केली आहे. मात्र या अपघातावरुन आणि समृद्धी महामार्गावर वारंवार घडणाऱ्या अपघातांवरुन शरद पवारांनी शिंदे फडणवीस सरकारचे कान टोचले आहेत.

काय म्हटलं आहे शरद पवार यांनी?

“समृद्धी महामार्गावर घडलेला अपघात हा अत्यंत दुर्दैवी आहे. २५ लोकांचा बळी जाणं ही बाब वेदना देणारी आहे. कदाचित शास्त्रीय दृष्ट्या नियोजन केलेलं नसावं. त्याचा दुष्परिणाम असा आहे लोक मृत्यू होत आहेत. आमच्या गावात आता चर्चा अशी आहे की एखाद दुसरा अपघात झाला आणि व्यक्ती गेली की लोक असं म्हणतात की या अपघातात एक देवेंद्रवासी झाला. हा महामार्ग करण्याच्या काळात, नियोजन आखण्यात ज्यांच्यावर जबाबदारी होती त्यांना लोक दोषी ठरवतात. ” असा अनुभव शरद पवारांनी सांगितला आहे.

अपघाताची घटना अत्यंत क्लेशदायक

“जी घटना घडली ती अत्यंत दुःखद आहे. २५ माणसं गेली ही बाब अत्यंत दुःखद आहे. आम्ही एकच गोष्ट ऐकतोय. अपघात झाला राज्य सरकारने पाच लाख रुपये दिले. पाच लाख रुपये मोजून हे प्रश्न सुटणार नाही. यासंदर्भात या देशात रस्ते-त्यांचं नियोजन यांचं ज्ञान असणारे कर्तबगार लोक आहेत त्यांची टीम तयार करावी. कुठे चूक झाली आहे कशामुळे चूक झाली आहे ते तपासलं गेलं पाहिजे. अपघातांची स्थिती, वाढते अपघात हे थांबतील कसे हे बघायला हवं. पाच लाख रुपये जाहीर करुन प्रश्न सुटणार नाहीत. जी कमतरता आहे ती शोधून काढली पाहिजे.” असं म्हणत शरद पवारांनी शिंदे फडणवीस सरकारचे कान टोचले आहेत.

मी काही किलोमीटर प्रवास केला आहे

“मी काही किलोमीटर या रस्त्यावर प्रवास केला आहे. रस्ता म्हटलं की काही खुणा डोक्यात असतात की इथे झाड आहे, काही ठिकाणी वळण आहे. मात्र हा सलग सरळ रस्ता आहे. वाहन चालवणाऱ्यावर याचा काही परिणाम होतो का? अशी काही शंका लोकांनी बोलून दाखवली आहे. मात्र मी काही त्यातला तज्ज्ञ नाही पण कुठे त्रुटी राहिल्या आहेत ते पाहिलं गेलं पाहिजे.” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.