Shara Pawar : देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की मला मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीस यांची ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो असं अभिष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी करतो असं म्हणत शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनीही देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज ५५ वा वाढदिवस आहे. या वाढदिवसानिमित्त एका विशेष पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं. या पुस्तकात शरद पवारांनी एक लेख लिहून देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.

शरद पवार यांच्या लेखात त्यांनी काय म्हटलं आहे?

क्रियाशील राहण्यासाठी प्रकृती शिडशित असावी असे स्थूलमानाने म्हटले जाते. पण आम्हा दोघांमधील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत असा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचे बाळकडू जरी घरातून मिळाले तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणं, उभं राहणं आणि नेटाने पुढे जाणं आव्हानात्मक होतं. त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचे आहे.

देवेंद्र फडणवीस पट्टीचे हजरजबाबी-शरद पवार

देवेंद्र फडणवीस कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य आहे ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसतानाही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी ही खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. त्यांनी केलेल्या कामांचा उहापोह कॉफी टेबल बुकमध्ये होईलच. परंतु, मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावर मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो.

सध्या राजकारणात मतभेदांनी टोक गाठलं आहे-पवार

पूर्वीचे राजकारण आणि आजचे राजकारण फार बदलले आहे. पूर्वी निवडणुकांमध्ये वाद-प्रतिवाद होत, कलगीतुरे रंगत असत. पण निवडणुका संपल्या की सत्ताधाऱ्यांना संरचनात्मक आणि सकारात्मक कार्याकडे, समाजकारणाकडे वळता येई. आजकाल असे होत नाही. राजकारण ही सततची प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे डाव, प्रतिडाव, कुरघोडी या नित्याच्या बाबी झाल्या आहेत. मतभेदांनी टोक गाठलं आहे. त्यामुळे नकारात्मक प्रतिक्रियात्मक कार्यासाठी उर्जेचा व्यय होतो. त्याचा अनिष्ट परिणाम राज्याच्या दूरगामी धोरणावर आणि जनतेच्या व्यापक हितावर होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कौटिल्याने अर्थशास्त्रात राजसत्ता अबाधित राहून तिचा विस्तार व्हावा आणि जनतेचे हित जपावे व जनकल्याणात वृद्धी व्हावी असं सांगितलं आहे. कौटिल्याची योगक्षेम या राजकीय या राजकीय संकल्पनेत राज्यकर्त्यांचे अंतिम ध्येय केवळ राजकीय स्थैर्यप्राप्ती नाही तर जनहित आहे. देवेंद्र यांनी स्वतःला सिद्ध केलं आहे. त्यामुळे राजकीय आखाड्याबाहेरील क्षितिजे अधिकाधिक पार करावीत, अशी माझी अपेक्षा आहे. त्यांच्या हातून व्यापक जनहिताची कार्ये पार पडतील, देशहितासाठी त्यांचं योगदान लाभो याकरिता माझ्या शुभेच्छा आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची अस्मिता राखण्यासाठी, महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी, महाराष्ट्राची पुरोगामी, विज्ञानवादी आणि सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी अधिक स्वयंभू होवोत. त्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाबो ही सदिच्छा वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त करतो. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.