खरी शिवसेना कोणाची? पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. तरी, त्याचा फैसला आज ( ५ सप्टेंबर ) मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या दोन दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने 'जनता की अदालत'मध्ये होणार आहे. त्यात शिवसेनेच्या मेळाव्याला सुरुवात झाली आहे. या मेळाव्यात शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. "शिंदे गटाचे झालेले बंड हे दोन दिवसांचे नव्हते. दीड वर्षापासून हे कटकारस्थान रचलं जात होते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरविकासखाते आपल्याकडे ठेवायला हवं होते. अन्यथा ही वेळ आली नसती. एखाद्या मुलीला सहकार्य करायचे आणि त्यामाध्यमातून तिचं शोषण करायचे, असं महापाप एकनाथ शिंदे यांनी केलं आहे," असा गंभीर आरोप नितीन देशमुख लावला आहे. "आमदारांना निधी आणि मदतीच्या माध्यमातून सहकार्य करायचं. त्यानंतर या उपकाराची फेड या शोषणाच्या मदतीने केली जायची. ही एकनाथ शिंदे यांची निष्ठा आहे. आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेल्यावर शिवसेनेचे आमदार तिकडेच ठेवण्याचे नियोजन होते. मात्र, आमदार अयोध्या दौऱ्यावर गेले नसल्याने ते षडयंत्र फसलं," असेही नितीन देशमुख यांनी स्पष्ट केलं.