शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत सध्या वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला असून शरद पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत. आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. अनंत गीतेंच्या या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने नाराजी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील प्रतिक्रिया दिली असून शरद पवार देशाचे नेते असल्याचं म्हटलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शरद पवार आमचे नेते नाहीत, महाविकास आघाडी म्हणजे सत्तेची तडजोड; अनंत गीते यांचं वक्तव्य

संजय राऊत यांना यावेळी अनंत गीते यांच्या वक्तव्यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्याला काही माहिती नाही सांगत बोलण्यास नकार दिला. मात्र नंतर पत्रकारांनी पुन्हा विचारलं असता ते म्हणाले की, “शरद पवार देशाचे नेते आहेत. महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र असून शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस यांनी एकत्र येऊन सरकार बनवलं आहे. महाराष्ट्रातील सरकार पाच वर्ष टीकेल. कारण या सरकारला संपूर्ण महाराष्ट्राची मान्यता आहे”.

दरम्यान काँग्रेस आणि शिवसेना कधीच एकत्र होऊ शकत नाही यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे त्यासंबंधी निर्णय घेतील. पक्षाचे प्रमुख यांसंबंधी निर्णय घेत असतात. या क्षणी आम्ही सरकारमध्ये एकत्र असून सरकार चांगलं चालत आहे”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनंत गीते यांनी काय म्हटलं आहे –

अनंत गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला, पवार आमचे नेते होऊ शकत नाहीत, आमचे नेते बाळासाहेब ठाकरेच असं सांगत गीतेंनी राष्ट्रवादी काँग्रेसवर तोफ डागली आहे.

” काँग्रेस सुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादी सुद्धा काँग्रेस आहे, तरी एकमेकांचे तोंड बघत होते का? एकमेकांचे कधी जमत होते का? यांचा विचार एक आहे का ? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापि होऊ शकणार नाही. मुळात राष्ट्रवादी काँग्रेसचा जन्मच काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरु तो होऊ शकत नाही, आमचे गुरु फक्त बाळासाहेर ठाकरे. महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे. ” असं वक्तव्य अनंत गीते यांनी केलं आहे.