विधानसभा निवडणुकीत आपण एकत्र लढणार असलो असं शिवेसना आणि भाजपा दावा करत असलं तरी अद्याप नेते एकमेकांविरोधात वक्तव्य करत आहेत. जागा वाटपावरुन अद्यापही दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये मतभेद आहेत. यातच शिवसेना उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जागावाटपावरुन बोलताना शिवसैनिकांनी फक्त झेंडे उचलायचे का? असा सवाल विचारला आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने पुण्यातील आठ जागांची मागणी केली आहे. दरम्यान शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भोसरी मतदारसंघावर दावा केला आहे. यावेळी त्यांनी फक्त झेंडे उचलायचे का? असा सवाल भाजपाला केला आहे. भोसरी मतदारसंघ मूळचा शिवसेनेचा आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
“भाजपा आणि शिवसेनेत पुण्यातील जागा वाटपावरुन वाद होण्याची शक्यता आहे. भोसरी मतदारसंघा मूळचा शिवसेनेचा असून २००९ मध्ये युती नसताना ही जागा शिवसेनेच्या वाट्याला आली होती. २०१४ मध्ये आमच्या पक्षाला दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती,” अशी माहिती शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत ही जागा नेमकी कोणाला मिळते हे पहावं लागणार आहे.