महाराष्ट्र ‘धर्म’ हा मर्दाचा व स्वाभिमान्यांचा आहे. तुंबाजी व मंबाजीसारख्यांचा तो नाही. लढण्याआधीच या लोकांनी शस्त्र ठेवली. जो लढलाच नाही त्याने विजयाचे हाकारे देऊ नयेत. लढून हरणारऱ्यांनाही महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आहे. मोगलांना आपल्या लेकी, सुना देऊन स्वतःची मुंडकी व पदे वाचवणाऱ्यांची कदर महाराष्ट्राने कधीच केली नाही. मिंध्यांनी हीच मोगल नीती वापरली, पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे मंबाजी, तुंबाजींनी लक्षात ठेवावे, असं म्हणत शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

“आम्ही आमची धर्मनिरपेक्ष भूमिका सोडलेली नाही. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाचा आत्मा असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी (अजित) कमळावर नव्हे, तर घड्याळावर लढणार असल्याचेही अजित पवारांनी जाहीर केले. धर्मनिरपेक्षतेसाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, असा दणकाही पवारांनी उडवला आहे. महाराष्ट्राच्या सरकारमध्ये वैचारिक गोंधळाचे चित्र निर्माण झाले आहे ते असे. भारतीय जनता पक्ष हा हिंदुत्ववादी, त्यांच्याबरोबरचा शिंदे गट हा बोगस हिंदुत्ववादी अशा दोघांच्या कात्रीत अजित पवारांचा धर्मनिरपेक्षवादी गट अडकला आहे,” असा टोला ठाकरे गटानं लगावला आहे.

हेही वाचा :

“अजित पवार हे कोणत्याच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत”

“शिंदे गटाने व अजित गटाने कोणत्या चिन्हावर लढायचे हे दिल्लीतील भाजपा हायकमांड ठरवणार आहे. मुळात कलंकित चेहऱ्यांना, ‘मिरची’ छाप व्यापाऱ्यांना उमेदवारी देऊ नये, असे फर्मान सुटले तर शिंदे व अजित गटातील ९० टक्के लोक बाद होतील. स्वत: अजित पवार हे कोणत्याच चिन्हावर निवडणूक लढवू शकणार नाहीत. भाजपा व त्यांच्याबरोबर दोन्ही गटांत आताच धुसफूस सुरू झाली आहे. कलंकित लोकाना उमेदवाऱ्या मिळू नयेत व मिळाल्याच तर आम्ही त्यांचा प्रचार करणार नाही, अशी भाजपाच्या प्रमुख मंडळींची भूमिका आहे असे वृत्त संघ परिवारानेच सोडले आहे. पण, पक्ष फोडताना सध्याचे दिल्लीश्वर फुटीर नेत्यांच्या हाती मूळ पक्षाचे चिन्ह बिदागी म्हणून ठेवतात. त्यामुळे घड्याळावर किंवा धनुष्यबाणावर लढणार असे हे लोक सांगतात. घड्याळावर लढा किंवा धनुष्यबाणावर लढा, जनता फुटिरांना समर्थन देणार नाही हे महाराष्ट्राचे जनमानस आहे,” असं ठाकरे गटानं म्हटलं.

हेही वाचा : “मी ६० वर्षांचा झाल्यावर वेगळी भूमिका घेतली, काहींनी ३८ व्या वर्षी…”, अजित पवारांचा शरद पवारांवर हल्लाबोल

“मोदी व्यक्तिगतरीत्या निवडून येतील, पण…”

“मिंधे व फजित गटातील बहुतेक लोकांवर घोटाळ्यांचे आरोप आहेत. अटकेच्या भयाने ते कमळाबाईच्या आश्रयाला गेले. त्यांचे ते धर्मनिरपेक्षता, पुरोगामित्व, समाजसुधारकांचा वारसा वगैरे सगळे दावे झूठ आहेत. अजित पवार सांगतात, जनता मोदींनाच निवडून देईल. मोदी व्यक्तिगतरीत्या निवडून येतील, पण त्यांचा पक्ष पराभूत होईल. एकवेळ मोदी जिंकतील, पण महाराष्ट्रातील दोन्ही गटांचे बेइमान लोक सपशेल पराभूत होतील. त्यामुळे मोदी यांच्या विजयाचा बँडबाजा इतर कोणी वाजवायची गरज नाही व महाराष्ट्रातील फुटीर गटांमुळे भाजपाच्या अंगावरील मांस तोळाभर वाढले अशा भ्रमात या मंडळींनी राहू नये,” असं ठाकरे गटानं म्हटलं आहे.

हेही वाचा : “प्रभू श्री राम तुमची मालमत्ता आहे का?” उद्धव ठाकरेंचा भाजपाला थेट सवाल; म्हणाले, “केंद्रात आमचं सरकार येणार अन्…”

“राज्यातील ढोंगी व डरपोक गवत कायमचेच उपटून टाकायचे आहे”

“सध्याच्या दिल्लीश्वरांना महाराष्ट्राचे महत्त्व खतम करायचे आहे. स्वाभिमान पायदळी तुडवायचा आहे. मुंबईचा सौदा करायचा आहे. म्हणून शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस हे प्रादेशिक अस्मिता जपणारे पक्ष त्यांना संपवायचे आहेत. पवार यांच्या कुटुंबात काय चालले आहे, कोण एकत्र येतायेत व कोण वेगळ्या पाटावर बसताहेत हा त्यांचा प्रश्न. त्यांचे कुटुंब त्यांची जबाबदारी, पण लोकांच्या मनात अजिबात संभ्रम नाही. लोकांना राज्यातील ढोंगी व डरपोक गवत कायमचेच उपटून टाकायचे आहे. महाराष्ट्र ‘धर्म’ हा मर्दाचा व स्वाभिमान्यांचा आहे. तुंबाजी व मंबाजीसारख्यांचा तो नाही. लढण्याआधीच या लोकांनी शस्त्रे ठेवली. जो लढलाच नाही त्याने विजयाचे हाकारे देऊ नयेत. लढून हरणाऱ्यांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले आहे. मोगलांना आपल्या लेकी, सुना देऊन स्वतःची मुंडकी व पदे वाचवणाऱ्यांची कदर महाराष्ट्राने कधीच केली नाही. मिंध्यांनी हीच मोगल नीती वापरली, पण हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे हे मंबाजी, तुंबाजींनी लक्षात ठेवावे,” असं ठाकरे गटानं मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री पवार यांना सुनावलं आहे.