Sambhaji Brigade and Shivsena Alliance : एकीकडे शिवसेनेतील मोठा गट फोडून एकनाथ शिंदेंनी भाजपासोबत सरकार स्थापन केलं असताना दुसरीकडे राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड समोर आली आहे. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेनं हातमिळवणी केली असून इथून पुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेत संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांसमवेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेदेखील उपस्थित होते. दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्यासाठी एक समन्वय समितीदेखील नेमण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी दिली.

“आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू”

“आपण एका विचाराने एकत्र आलो आहोत. गेल्या महिन्या-दोन महिन्यांत जे आपल्या विचारांचे आहेत आणि जे आपल्या विचारांच्या जवळपासही येणारे नाहीत असे लोक स्वत:हून मला येऊन सांगत आहेत की आता संविधान वाचवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. प्रादेशिक अस्मिता टिकवण्यासाठी आपल्याला एकत्र यायला हवं. मी स्वागत यासाठी केलं की आपण सगळेजण शिवप्रेमी आहोत. आपला आजपर्यंतचा इतिहास आहे की मराठ्यांना दुहीचा शाप गाडत आला आहे. आपण एकत्र येऊन एक नवीन इतिहास घडवू. या दुहीच्या शापालाच गाडून टाकू”, अशी प्रतिक्रिया यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“महाराष्ट्रात जे काही घडवलं किंवा बिघडवलंय ही महाराष्ट्राची ओळख नाही. ही शिवरायांच्या, संभाजीराजांच्या महाराष्ट्राची ओळख नाही. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, तर तसं वागायला हवं. तसं वागायचं नाही आणि दाखले देताना शिवाजी महाराज, संभाजी महाराजांचे दाखले द्यायचे. हा महाराष्ट्र देशाला मार्गदर्शक ठरेल, असा आपण घडवू. त्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आलेला आहात म्हणून मी तुमचं स्वागत करतो”, असं यावेळी उद्धव टाकरे संभाजी ब्रिगेडला उद्देशून म्हणाले.