गतवर्षीच्या तुलनेत यंदा टंचाईग्रस्त गावे व वाडय़ांमध्ये वाढ झाली असून या टंचाईग्रस्त गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ३७ टँकर्सची आवश्यकता आहे. तसेच पाणी टंचाई निवारणासाठी १९९ पाणी योजनांची कामे हाती घेण्यात आली आहेत. या करिता रत्नागिरी जिल्हा परिषदेने २ कोटी ६० लाख रुपयांचा टंचाई आराखडा तयार केला असून त्याला जिल्हा प्रशासनाने नुकतीच मान्यता दिली आहे. यावर्षी जानेवारी ते जून २०१३ या कालावधीत जिल्ह्य़ातील २७४ गावे आणि ६३२ वाडय़ांमध्ये पाण्याची टंचाई जाणवणार आहे. त्यामध्ये जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात १०४ गावे अािण १५९ वाडय़ा, तर एप्रिल ते जून या कालावधीत १६९ गावे आणि ४७३ वाडय़ांमध्ये पाणीटंचाई जाणवणार आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने सादर केलेल्या आराखडय़ात १९९ पाणी योजना घेण्यात आल्याचे नमूद केले असून ३७ टँकर्सनी टंचाईग्रस्त गावांना पुरवठा करावा लागणार असल्याचे म्हटले आहे.
 विंधन विहिरींसाठी ५३ लाख, टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी ५ लाख, नळपाणी योजनांसाठी १ कोटी ५९ लाख, तर विहिरीतील गाळ काढण्यासाठी १ लाख रुपयांचा निधी लागणार आहे.
गतवर्षी जिल्ह्य़ात २७१ गावे आणि ६१५ वाडय़ांमध्ये पाणी टंचाई जाणवत होती. तर यावर्षी २७४ गावे आणि ६३२ वाडय़ांमध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी ३ गावे आणि १७ वाडय़ांची टंचाईग्रस्त म्हणून भर पडली आहे. टंचाईग्रस्त गावे पुढील प्रमाणे असून कंसातील संख्या वाडय़ांची आहे. मंडणगड तालुका -९ (१८), तसेच ११ नळपाणी योजना, दापोली – ५० (१२२) व ४४ पाणी योजना, खेड – ३५ (४९) व १२ पाणी योजना, गुहागर -१ (४) व २ पाणी योजना, चिपळूण ४३ (११०) व २३ पाणी योजना, संगमेश्वर – ३६ (८२) व १८ पाणी योजना, रत्नागिरी -३१ (९५) व २३ पाणी योजना, लांजा -३३ (८०) व ३३ पाणी योजना, राजापूर ३६-(६२) व ३३ पाणी योजनांचा समावेश आराखडय़ात आहे. यात सर्वाधिक पाणीटंचाई दापोलीत तर सर्वात कमी पाणी टंचाई गुहागर तालुक्यात जाणवणार आहे.