राहाता : शिर्डी व सावळीविहीर परिसरातील अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काची जागा देण्याचा ऐतिहासिक निर्णय पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणे हेच खरे माणुसकीचे कार्य असल्याचे प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी केले.
तालुक्यातील सावळीविहीर येथील अतिक्रमित ग्रामस्थांना शेती महामंडळाच्या जमिनीमधून विनामूल्य जागा हस्तांतरण डॉ. सुजय विखे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात जागेच्या उताऱ्याचे वितरण करण्यात आले. यावेळी प्रातांधिकारी माणिक आहेर, तहसीलदार अमोल मोरे, सरपंच उमेश जपे, आप्पासाहेब जपे, बाळासाहेब जपे, विकास जपे, शांताराम जपे, रावसाहेब देशमुख, राजू जपे, रूपाली आगलावे तसेच शासकीय अधिकारी व लाभार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. विखे म्हणाले, हा कार्यक्रम एक दिवसात झाला नाही. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर, विरोधकांच्या टीका सहन करत, आपण केवळ आश्वासन न देता कृती केली. जात, धर्म, पक्ष न पाहता फक्त गरज पाहून हे वाटप केले गेले. ही आमच्या कार्यपद्धतीची ओळख आहे. सोमय्या साखर कारखाना येथील जमीन ४०० कुटुंबांना घरकुलसाठी जागा मिळावी, यासाठी सोमय्या यांच्याशी चर्चा सुरू आहे. लवकरच ते प्रश्न मार्गी लावून संबंधितांना त्यांचे हक्काचे घर मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
या जागेचे हस्तांतरांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पडली. यामध्ये कोणत्याही पुढाऱ्याच्या नातेवाईकांचा किंवा दलालांचा हस्तक्षेप होऊ दिला नाही. या जमिनीवर एकाही पुढाऱ्याचा नातेवाईक नाही, कारण आमचे धोरण स्पष्ट आहे. गोरगरीब जनतेला न्याय भेटला पाहिजे. पुढील टप्प्यांबाबतही या नव्या वसाहतीत अंगणवाडी, समाजमंदिर आणि मोफत लग्न सभागृह उभारण्यात येणार आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत वाळू ग्रामपंचायतीमार्फत दिली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
शिर्डीमध्ये कायदा-सुव्यवस्था अत्यंत महत्त्वाची आहे. कोणतीही गुन्हेगारी प्रवृत्ती सहन केली जाणार नाही. गावातील प्रत्येक महिला-मुलगी रात्रीही सुरक्षिततेची पूर्ण खात्री घेऊन वावरू शकेल, असा समाज आम्हाला निर्माण करायचा आहे. आज गरिबांच्या चेहऱ्यावरचा आनंदच आमचे खरे यश आहे. हे राजकारणासाठी नाही, तर माणुसकीसाठी करीत असल्याचे सुजय विखे यांनी सांगितले.
लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. सुजय विखे यांनी दिली. या जागेवर रहिवाशांसाठी अर्धा गुंठा जमीन वाटून त्यांच्या नावे घरकुल बांधले जाणार आहे. उर्वरित जागेत अंगणवाडी करण्यात येणार असून, त्या परिसरात सार्वजनिक शौचालय, नाल्या, काँक्रीट रस्ते, पाणीपुरवठा योजना, विद्युत डीपी, सौरदिवे अशा मूलभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. विकासकामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही आणि जेव्हा ही घरे पूर्ण होतील, तेव्हा मी प्रत्येक कुटुंबासोबत जेवायला येईन, असे भावनिक उद्गार डॉ. विखे यांनी यावेळी काढले.