संगमनेर : पुढच्या अडीच वर्षात जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात २५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे नियोजन करून दुष्काळी भागाला सुजलाम् सुफलाम् करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी ग्वाही माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. मात्र, मागील १८ वर्षांत फक्त पाच कोटी रुपये खर्च केले, अशी टीकाही त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता केली.

भोजापूर चारीचा जलपूजन सोहळा नान्नज दुमाला येथे डॉ. विखे यांच्या उपस्थितीत आज, गुरुवारी झाला. या निमित्ताने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या वेळी नीलम खताळ, शेतकरी नेते किसन चत्तर, भीमराज चतर, शिवसेनेचे जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, निमोणचे सरपंच संदीप देशमुख, संपत फड यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

या प्रसंगी डॉ. विखे म्हणाले की, ४० वर्षे सत्तेत राहून पाणी न आणणाऱ्यांना जनतेने बाजूला केले आणि महायुतीवर विश्वास ठेवला. आज त्या विश्वासाला उत्तर दिले जात आहे. मी यापूर्वी शब्द दिला होता, की ज्या दिवशी पाणी पोहोचेल त्या दिवशीच मी इथे सभा घेईन. आज तो दिवस आला आहे. ही केवळ सभा नाही तर जनतेच्या आश्वासन पूर्तीची साक्ष आहे. जलक्रांती ही केवळ विकासाचे प्रतीक नाही, तर सत्तांतरानंतर जनतेच्या अपेक्षांना मिळालेले ठोस उत्तर आहे. महायुतीच्या नेतृत्वात संगमनेर तालुका जलस्वावलंबनाच्या दिशेने पुढे जात आहे. पाणी, रस्ते, शेती, शिक्षण, आरोग्य या साऱ्या क्षेत्रांतील कार्यक्षम नेतृत्वच खरा विकास घडवू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्रीमती खताळ म्हणाल्या, की वर्षानुवर्षे तालुक्यातील महिलांनी पाण्यासाठी होरपळ सोसली. आज त्या प्रतीक्षेला न्याय मिळाला आहे. डॉ. सुजय आणि मंत्री विखे यांनी दिलेला शब्द आमदार खताळ यांनी खरा करून दाखवला आहे. तालुका त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

आमदार खताळ यांनी हा संपूर्ण भाग पाणीदार करण्यासाठी जिद्दीने पाठपुरावा केला. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे यांच्या माध्यमातून हा भाग आता जलसमृद्ध होतोय. त्यांच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी ती यशस्वीपणे पार पाडली याचा सार्थ अभिमान आहे. – डॉ. सुजय विखे

बाळासाहेब विखे पाटलांवर टीका करणाऱ्यांनी चार दशके काय केले? आज विकासकामाचे उत्तर जनतेसमोर आहे. पाणी हा हक्क आहे, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून पाणी आले. – भीमराज चत्तर, भाजप नेते, माजी सरपंच, नान्नज दुमाला