एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांनी संयुक्तपणे राज्यात सरकार स्थापन केले आहे. या सत्ताबदलानंतर महाविकास आघाडीचे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाचे नेते विरोधकांच्या भूमिकेत गेले आहेत. राज्यात सत्तानाट्य सुरु असताना गॅस, तसेच विजेचे दर वाढवण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीला सामोरे जावे लागत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा>>> शेती खरेदीच्या बदल्यात दिली कागदाने भरलेली बॅग; तोतया डॉक्टरला बेड्या

“महाराष्ट्रात नव्या सरकारने स्थानापन्न होताच जनतेला वीजदरवाढीचं लगोलग तिसरं गिफ्ट देऊन टाकलं आहे. यापूर्वी गॅसच्या दरात ५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. दूग्धजन्य पदार्थ व अन्नधान्यांवर जीएसटी हे दोन गिफ्ट या सरकारने दिलेच होते. आता वीजदरवाढीचं हे तिसरं गिफ्टदेखील जनतेला देण्यात आलं आहे,” असे सुप्रिया सुळे ट्वीटरद्वारे म्हणाल्या आहेत.

हेही वाचा>>> ‘ज्यांचं रक्त भगवं ते उद्धव ठाकरेंसोबत,’ शिवसेना संपली म्हणणाऱ्यांना आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

तसेच, ही वीजदरवाढ निषेधार्थ आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपणास विनंती आहे की, कृपया जनतेला महागाईपासून दिलासा द्यावा, असेदेखील सुप्रिया सुळे ट्वीटद्वारे एकनाथ शिंदे यांना उद्देशून म्हणाल्या आहेत.

हेही वाचा>>> संजय राऊतांविरोधात अटक वॉरंट निघताच नारायण राणेंची टीका, म्हणाले “ते काय…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांनी हे सरकार राज्याच्या विकासासाठी दिवसरात्र मेहनत करेन, अशी ग्वाही दिली होती. तसेच येणाऱ्या काळात इंधनावरील करात कपात केली जाईल, असे आश्वासन शिंदे यांनी जनतेला दिले होते. त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारने वीजदरातही कपात करावी, अशी मागणी केली आहे. सुळे यांच्या या मागणीनंतर शिंदे काय निर्णय घेणार? हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.