राज्यभरातील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या मृत्यूंबाबत चिंता व्यक्त केली जात असतानाच दिंडोरी तालुक्यातील करंजी येथील गुरुकुल आश्रमशाळेत आठवीत शिकणाऱ्या किशोर प्रकाश गवळी या पाच दिवसांपासून बेपत्ता विद्यार्थ्यांचा मृतदेह घोडेवाडीनजीक पाझर तलावात सापडला. या प्रकाराबाबत नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे.
गुरुदेव दत्त गुरुकुल आश्रमशाळेत शिकणारा किशोर १५ डिसेंबर रोजी सायंकाळपासून बेपत्ता होता. सायंकाळी हजेरी घेत असताना शिक्षकांना किशोर गवळी उपस्थित नसल्याचे लक्षात आले. त्यांनी दोन दिवस त्याचा शोध घेऊन अखेर वणी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीदेखील त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात घोडेवाडी येथील पाझर तलावात एक मृतदेह आढळून आल्याचे समजल्यावर पोलिसांनी ओळख पटविली असता तो किशोरच असल्याचे निष्पन्न झाले. वणी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सटाणा तालुक्यातील मूळचे रहिवासी प्रकाश गवळी नाशिक येथे एका कंपनीत नोकरीस आहेत. किशोर हा त्यांचा एकुलता एक मुलगा. अभ्यासात हुशार असल्याने तो विद्यार्थी प्रतिनिधीदेखील झाला होता. शाळेच्या काही विद्यार्थ्यांबरोबर तो आश्रमशाळेपासूनच पाच किलोमीटर अंतरावरील पाझर तलावात आंघोळीसाठी गेला होता. या वेळी खोलीचा अंदाज न आल्याने तो बुडाला. त्याच्यासमवेतचे सहकारी घाबरून आश्रमशाळेत परत आले; परंतु त्यांनी हा प्रकार शिक्षकांना सांगितला नाही. किशोरच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला असून तशी लेखी तक्रार वणी पोलिसांकडे केली आहे.