रेल्वे प्रशासनाकडून मुलाचा गौरव सोलापूर : एका किशोरवयीन मुलाने वेळीच सतर्कता दाखविल्यामुळे रेल्वे अपघात टळल्याची घटना कुर्डूवाडी-दौंड मार्गावर घडली. या घटनेची दखल घेत मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी त्या किशोरवयीन मुलाला पाच हजारांचे रोख बक्षीस व प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले. धनराज जैतकर (वय १५, रा. ऐनपूर, ता. रावेर) असे या मुलाचे नाव आहे. पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी धनराज जैतकर हा आपल्या कुटुंबीयांसह आला होता. पंढरपूरहून भुसावळकडे रेल्वेने परतीचा प्रवास करीत असताना मध्यरात्रीच्या सुमारास कुर्डूवाडी ते दौंडच्या दरम्यान रेल्वे डब्यावर जोरात दगड मारल्यासारखा आवाज येत होता. गाडीचे स्पिं्रग शॉकअपसर तुटल्यामुळे दगड उडून गाडीवर पडत होते. दोन किलोमीटर अंतर कापल्यानंतर दगड पडत असल्याचा आवाज आणखी जोरात येऊ लागला. पहाटे दीडची वेळ असल्यामुळे बहुसंख्य प्रवासी झोपेत होते. जे प्रवासी जागे होते, त्यापैकी कोणीही साखळी ओढण्याची हिंमत दाखवत नव्हते. मात्र त्यावेळी किशोरवयीन धनराज जैतकर याने प्रसंगावधान राखून रेल्वेची साखळी ओढून गाडी थांबविली. गाडी थांबल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता गाडीचे पाटे (स्प्रिंग) तुटल्याचे आढळून आले. त्यानंतर लगेचच दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले. किशोरवयीन धनराज जैतकर याने वेळीच दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे कुर्डूवाडी-दौंड दरम्यान रेल्वे अपघात टळला. अन्यथा अपघात होऊन मोठी हानी झाली असती. धनराजने दाखविलेल्या सतर्कतेची दखल रेल्वे प्रशासनाने घेऊन त्याचा गौरव केला आहे. मध्य रेल्वे विभागीय व्यवस्थापक हितेंद्र मल्होत्रा यांनी धनराज यास गौरवताना त्याच्या पुढील शिक्षणासाठी व्यक्तिश: मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी अपर विभागीय व्यवस्थापक व्ही. के. नागर व अन्य रेल्वे प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.