राज्यात शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. तसेच, सोलापूरमधील एका तरूण शेतकऱ्याने नुकतंच फेसबुक लाईव्ह करत या परिस्थितीला वैतागून आत्महत्या देखील केली आहे. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आज अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर माध्यमांशी बोलाता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाला ऊर्जामंत्र्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत, या सरकारने आज सभागृहातून पळ काढला आहे. असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “सोलापूर जिल्ह्यातील सुरज जाधव या तरूण शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करून, मला आता जगण्यात रस नाही कारण हे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करतय, असं सांगून आत्महत्या केली. कारण, त्याचं वीज कनेक्शन या सरकारने कापलं होतं. ही गंभीर बाब आज सभागृहात आम्ही उपस्थित केली आणि तो एकटा सुरज नाही, तर कोट्यावधी शेतकऱ्यांची भावना या सुरजच्या बलिदानातून खरं म्हणजे सरकार समोर आली आहे. संवेदनशीलता दाखवत, सरकारने शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणं बंद करावं. ही मागणी आम्ही लावून धरली. पण महाराष्ट्राचं सरकार हे संवेदनहीन आहे, हे कोडगं आहे. हे मुंबईच्या बिल्डरांना कोट्यावधी रुपयांची सूट देऊ शकतं. प्रीमियमध्ये सूट देऊ शकतं. हे दारू विक्री करणाऱ्यांना सूट देऊ शकतं. हे बेवड्यांसाठी पॉलिसी तयार करू शकतं, पण हे सरकार शेतकऱ्यांनी एवढीच विनंती केली, की सातत्याने नापिकी आहे. कधी अतिवृष्टी आहे तर कधी अवर्षण आहे. त्यामुळे विजेच्या बिलाची थकबाकी आहे. आमचं वीज कनेक्शन कापू नका. तरी देखील सरसकट मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांच्या विजेचं कनेक्शन कापणं सुरू आहे.”

उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत दिसत नाही –

तसेच, “ आम्ही हे देखील निदर्सनासा आणून दिलं, की दोनवेळा उपमुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलं की आम्ही वीज कनेक्शन कापणार नाही. शेवटचं आश्वासन तर त्यांचं असं होतं, की ५०० -७०० रुपये जरी भरले शेतकऱ्यांनी तरी देखील आम्ही वीज कनेक्शन मे महिन्यापर्यंत कापणार नाही. परंतु, उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला कोणतीच किंमत दिसत नाही. ऊर्जामंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या शब्दाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि या पवित्र सभागृहाचा अपमान करत. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापणं सर्रास सुरू आहे.” असंही फडणवीस यांनी बोलून दाखवलं.

कामकाज आटोपून टाकलय आणि शेतकरी मात्र वाऱ्यावर आहेत –

याचबरोबर, “ आज एकीकडे शेतकऱ्यांचे कनेक्शन कापले जात आहेत, दुसरीकडे एका डीपीवरच्या सहा शेतकऱ्यांनी बील भरलं असलं आणि दोन शेतकऱ्यांनी बील भरलं नसलं, तरी संपूर्ण डीपी काढून नेली जाते आणि सर्व शेतकऱ्यांना वंचित ठेवलं जात आहे. हातातोंडाशी आलेली पिकं, फळबागा अडचणीत येत आहेत. रब्बीचा हंगाम तर खराब झाला, खरीपाचा हंगामही खराब होणार अशा प्रकारची अवस्था आता हळूहळू तयार होतेय. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. हाच असंतोष आज आम्ही सभागृहात मांडत होतो. खरं म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदार देखील पोटतिडकीने हेच सांगण्याचा प्रयत्न करत होते, की वीज कनेक्शन कापणं बंद करा. परंतु, त्यांची मुस्काटदाबी करण्यात आली आणि आम्हालाही हा मुद्दा मांडत असताना, तो मांडू देण्यात आला नाही. सरकारने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे आज सरकारने सभागृहातून पळ काढला. कामकाज आटोपून टाकलय आणि शेतकरी मात्र वाऱ्यावर आहे. ” असा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला.

आमचा संघर्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा सातत्याने सुरू राहील –

तर, “ एक सुरज जाधव फेसबुक लाईव्ह करत करत, देवाघरी गेला. आमची इतर शेतकऱ्यांना विनंती आहे, टोकाचं पाऊल उचलू नका. आम्ही तुमच्यासाठी संघर्ष करू. कुठल्याही परिस्थितीत हे शेतकरी विरोधी कोडगं सरकार आहे. या सरकारमध्ये केवळ वसूली आहे, सुल्तानी वसूली आहे. आस्मानी संकटापेक्षा सुल्तानी संकट मोठं आहे. त्या शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभा राहणार आहोत. जोपर्यंत वीज जोडणी ही परत मिळत नाही आणि वीज कापणं बंद होत नाही, आमचा संघर्ष सभागृहात आणि सभागृहाबाहेर हा सातत्याने सुरू राहील. या शेतकरी विरोधी ठाकरे सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो.” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Thackeray government fled the house today fadnavis msr
First published on: 07-03-2022 at 15:18 IST