सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे हल्ली बऱ्याच गोष्टींचे पुरावे मिळतात. कोणतीच गोष्ट लपून राहत नाही. त्यामुळे खोटं बोलणाऱ्यांची चांगलीच पंचाईत होते. अशीच पंचाईत राजकीय नेतेमंडळींचीही होते. आपण अमूक गोष्ट केलीच नाही, बोललोच नाही असं सराईतपणे बोलणाऱ्यांसाठी सीसीटीव्ही कॅमेरा चोख उत्तर आहे. परंतु, या सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे.
अजित पवार कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, “पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वीच्या काळात भाषणं चालू असतील, नेते बोलत असतील तर तेवढंच दिसायचं आणि त्यावरूनच पेपरमध्ये बातम्या यायच्या. एकेकाळचे मुख्यमंत्री म्हणायचे मी ऐकलंच नाही, माझं लक्षच नव्हतं. आता तसं करून चालत नाही. सगळा पुरावाच तिथे असतो.”
ही जुनी आठवण सांगत असताना अजित पवार पुढे म्हणाले, “सीसीटीव्ही आपण सगळीकडे बसवतोच आहोत. त्यामुळे तुम्हीही फार काळजीने वागा. तुमचं काही चुकीचं येत नाही ना याची काळजी घ्या. गंमतीचा भाग सोडा, पण काळजी खूप महत्त्वाची आहे.”
दरम्यान काही दिवसांपूर्वी छगन भुजबळांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. यावेळी अजित पवार व्यासपीठावरच उपस्थित होते. परंतु, मी छगन भुजबळांचं भाषण ऐकलंच नाही, असं अजित पवार म्हणाले. छगन भुजबळांच्या माईकचा आवाज उपस्थित जनसमुदायापर्यंत पोहोचला. परंतु, या माईकमुळे व्यासपीठावर भाषण ऐकून येत नाही, अशी अजित पवारांनी सारवासारव केली. या घटनेनंतर आज त्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याबाबत कार्यकर्त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.