“सम्यक विचार पहाडांसारखे उंच, निश्चल होते. मात्र, त्यांना वाहून नेणारी माणसं ढेकळं निघाली,” असे मत तिसऱ्या सम्यक साहित्य संमेलनाचे अध्यक्ष संजय पवार यांनी शुक्रवारी संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यात व्यक्त केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे पुणे विद्यापीठातील संत नामदेव सभागृहामध्ये या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे उद्घाटन परिवर्तन चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. माया पंडित यांच्या हस्ते झाले. या वेळी पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, सम्यक साहित्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष नामदेव ढसाळ, स्वागताध्यक्ष परशुराम वाडेकर, कार्याध्यक्ष डॉ. विजय खरे उपस्थित होते.
या वेळी संजय पवार म्हणाले,‘‘ शोषितांच्या व्यथा मांडण्याबरोबरच समता आणि परिवर्तन या मूल्यांचे संवर्धन हेच साहित्य निर्मितीचे प्रयोजन असले पाहिजे. व्यवस्थेमध्ये भरडल्या गेलेल्या लोकांच्या व्यथा मांडण्याची सुरुवात सत्तरच्या दशकात मोठय़ा प्रमाणात झालेली दिसत असली तरी या विद्रोहाची बीजे संत परंपरेत, फुले-आंबेडकरांच्या विचारात सापडतात. साहित्यात अठराव्या शतकात शोषितांच्या चळवळी संघटित झाल्या. त्याआधी सोळाव्या शतकात शिवरायांच्या राजकीय संघर्षांतही याचे संदर्भ सापडतात. तोच आपला वारसा आहे, असे पवार म्हणाले.
 या तिसऱ्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने फुले, शाहू, आंबेडकरांचा गजर, ब्राह्मणी व्यवस्थेवर टीका, बहुजनवाद, राजकीय नेतृत्वावर टीका हा नेहमीचा सिलॅबस बाजूला ठेवून थोडे अंतर्मुख होऊन यानंतर पंचवीस-तीस वर्षांत आपण नेमके कुठे असू याचा विचार करावासा वाटतो. यानंतर कुणाचे साहित्य टिकेल यापेक्षा मूळात साहित्यच टिकेल का, याचा विचार करण्याची गरज आहे. धर्म ही अफू ची गोळी आहे, हे तत्त्वज्ञान लोकांना पटतंय आणि धर्म आता जीवनाच्या अनेक क्षेत्रातून बाद होईल असे वाटत असतानाच, जगभर मूलतत्त्ववाद्यांनी डोके वर काढले आणि प्रचंड सार्वजनिक हिंसाचारासाठी या अफूचे व्यसन लागलेली नवी तरूण पिढी निर्माण झाली. महाराष्ट्रापुरते पाहिले तर स्वातंत्र्योत्तर काळात बाबासाहेबांची धर्मातराची चळवळ, संयुक्त महाराष्ट्र समिती, कम्युनिस्टांच्या कामगार चळवळी ते नक्षलवाद, शिवसेनेचा जन्म, ही सगळी काळाची अपत्ये होती. येणारा काळ गंभीर आहे, येणाऱ्या पिढय़ा ही अडगळ कशी पेलणार, हा प्रश्न आहे, असे संजय पवार म्हणाले.  
ढसाळ म्हणाले, ‘‘भांडवली लोकशाहीमुळे बाबासाहेबांच्या स्वप्नातील लोकशाही अशक्य झाली आहे. जनतेने पुन्हा एकदा लढा दिला पाहीजे. जागतिकीकरणाने शोषितांचा विकास होऊ दिला नाही. कष्टकरी समाज शासक नाही. म्हणून त्यासाठी लढणे गरजेचे आहे.’’