हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर हल्लाबोल केला. हे सरकार जनतेच्या मनातील नाही. जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. राजकीय कपटानं आलेलं सरकार आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्यात आली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अभिभाषणावर बोलताना सरकारवर टीका केली. फडणवीस म्हणाले, “हे सरकार कोणत्या दिशेनं जाणार आहे. हे दिसतंय. सरकारमधील तीन पक्षांमध्ये विसंवाद आहे.

आमच्यासोबत निवडणूक लढवणारा पक्ष दुसऱ्यांसोबत गेला. जनतेनं आम्हाला नाकारलं नाही. जनतेनं भाजपाला कौल दिला होता. १९९० नंतर पहिल्यांदा १०५ जागा मिळवणारा पक्ष भाजपा ठरला आहे. जनतेनं महायुतीला कौल दिला होता. पण, हे सरकार जनतेच्या मनातील नाही. जनतेनं निवडून दिलेलं सरकार नाही. राजकीय कपटानं आलेलं सरकार आहे. राजकीय स्वार्थापोटी आलेलं सरकार आहे,” असा आरोप फडणवीस यांनी केला.

“या सरकारमध्ये असलेल्या पक्षांनं २३ हजार कोटींची मदत देण्याची मागणी केली होती. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार, तर फळबागायतदारांना हेक्टरी ५० हजार मदतीची मागणी केली होती. पण, सत्तेत आल्यानंतर अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. आमचं काळजीवाहू सरकार असताना मदतीची तरतूद केली होती, असंही फडणवीस म्हणाले.

संविधानाच्या नियमाप्रमाणे कमीत कमी १२ मंत्री असायला हवे होते. पण, केवळ सहाच मंत्री आहेत. तरीही आम्ही आक्षेप घेतला नाही. कारण शेतकऱ्यांना मदत मिळेल अशी अपेक्षा होती. पण, ती अजून मिळालेली नाही. सरकारने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. हे सरकार काम करत नाही. हे सरकार कोणताही निर्णय घेण्यास तयार नाही,” असं फडणवीस म्हणाले.