अमरावती जिल्ह्य़ात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर नांदगावपेठनजीक उभारण्यात आलेल्या पथकर वसुली नाक्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. केवळ दहा किलोमीटरच्या प्रवासासाठी पूर्ण नागपूर महामार्गाचा टोल देण्याची पाळी मोर्शी-वरूडकडे जाणाऱ्यांवर आल्यानंतर आंदोलने झाली, पण त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. टोल नाक्याच्या रस्त्याला पर्यायी रस्ता म्हणून सुमारे ४०० मीटरचा पांदण रस्ता लोकसहभागातून बांधण्याचे अभिनव आंदोलन नुकतेच सुरू करण्यात आले. लोकांच्या रास्त मागणीकडे सरकारचे दुर्लक्ष आहे. दुसरीकडे पिंगळाई नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाच्या बांधकामासाठी राष्ट्रीय महामार्ग सहावरच तिवसा येथे टोल नाका अनेक वर्षांपासून सुरू आहे. या टोल नाक्याची मुदत केव्हापर्यंत आहे, याबाबत अजूनही संभ्रम आहे. गावकऱ्यांना या दोन्ही टोल नाक्यांवर टोल भरावा लागतो. गावकऱ्यांमध्ये त्याविषयी रोष आहे. हीच स्थिती विदर्भात सर्वच जिल्ह्य़ांमध्ये आहे.