कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदभवलेल्या अभूतपूर्व संकटातून सावरण्यासाठी आता तुळजाभवानी मंदिर संस्थान आणि उस्मानाबाद जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. तुळजाभवानी मंदिराच्या माध्यमातून पाच हजार तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दहा हजार जीवनाश्यक वस्तूच्या संचाचे वाटप केले जाणार आहे. हातावर पोट असणारे मजूर, निराधार आणि गोरगरिबांना तुळजाभवानी मंदिर आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मोठा आधार मिळणार आहे. तेल, मीठ, तांदूळ, गहू, साखर, डाळ आशा जीवनाश्यक वस्तूंच्या १५ हजार संचाचे वाटप केले जाणार असल्याची माहिती आमदार रणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाउन जाहीर केल्यामुळे आर्थिक आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण व शहरी भागातील अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली असून शेतमाल विकला जात नसल्याने शेतकरी वर्ग प्रचंड आर्थिक अडचणीत सापडला आहे. शहरातील बांधकाम व इतर छोटे मोठे व्यवसाय बंद पडले आहेत. परिणामी मजुरांचे देखील हाल होत आहेत. अशा परिस्थितीतअनेक कुटुंबांना दोन वेळचे जेवण मिळणे देखील कठीण झाले आहे. त्यामुळे तुळजाभवानी मंदिर संस्थांन व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गरजूंना १५ हजार जीवनावश्यक वस्तूंचे संच उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये गहू, तांदूळ, डाळ, साखर, तेल, मीठ यासारख्या जीवनावश्यक वस्तूंचा समावेश असणार आहे.

आणखी वाचा- Lockdown: धान्याचा काळाबाजार सुरुच, अलिबागमध्ये रेशन दुकानांवर कारवाई

जिल्हा प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली अनेक सेवाभावी संस्था, सहकारी संस्था व नागरिक देखील गरजूंना अन्नधान्य वाटप करत आहेत. तसेच जेवणाची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून जिल्ह्यात ५,००० जीवनावश्यक वस्तूंचे संच उपलब्ध करून दिले आहेत. अगदी त्याचप्रमाणे तुळजाभवानी मंदिरसंस्थानच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात ५,००० जीवनावश्यक वस्तूंच्या संच वाटप करण्याचे नियोजन सुरू आहे. मंदिर समितीचे सदस्य सचिन रोचकरी यासाठी विशेष परिश्रम घेत आहेत. मंदिर समितीच्या अध्यक्षा तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे यांच्या मान्यतेने आवश्यक साहित्याची खरेदी प्रक्रिया सध्या सुरू असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

आणखी वाचा- लॉकडाउनचा फटका, बीडमधील शेतकऱ्यानं तीन एकरातील झेंडू उपटून फेकला

जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या आपत्कालीन परिस्थितीत ग्रामीण जनतेला गरजूंना दिलासा देणं अत्यंत निकडीचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदने स्वनिधीतून पहिल्या टप्प्यात जीवनावश्यक वस्तूंचे १० हजार संच वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांच्याशी चर्चा झाली आहे. याबाबत तातडीने प्रक्रिया करण्याच्या सूचना त्यांना दिल्या असून ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनाही अवगत करण्यात आले असल्याचे पाटील यांनी सांगितले.