केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं नाव आणि चिन्ह गोठावलं आहे. अंधेरी-पूर्व विधानसभा निवडणुकीसाठी हा हंगामी निर्णय घेण्यात आला आहे. यावरती आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दूरदृष्य प्रणालीव्दारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी शिवसेना पक्ष स्थापना, पक्षातील बंडखोरी, केंद्रीय निवडणूक आयोग ते सर्वोच्च न्यायालयात असलेली सुनावणी यावरती भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

“शिवसैनिकांना दमदाटी केली जात आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी सुद्धा केलं नाही, ते तुम्ही करत आहात. शिवसेनेवर बंदी घालण्याची मागणी तेव्हा इंदिरा गांधींनी फेटाळली. काँग्रेसने कधी शिवसेनेवर बंदी घालण्याचा विचार केला नाही. पण, तुम्ही ज्यांच्याबरोबर गेला आहात, त्यांचा हेतू शिवसेना संपवण्याचा आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी शिंदे गटासह भाजपावर केली आहे.

हेही वाचा – तीन चिन्ह, तीन नावं.. उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव; म्हणाले, “लवकरात लवकर…!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रबोधनकार आणि बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलं की, आत्मविश्वास असेल तर, जगाच्या पाठीवर कुठेही जा तुला कोणी आडवू शकणार नाही. त्यामुळे मी डगमगणार नाही. तुमची बुद्धी गोठलेली नसेल तर, तुम्हाला आव्हान आहे, बाळासाहेबांचे नाव न वापरता जनतेच्या समोर जा. स्वत:चा पक्ष काढा किंवा भाजपात प्रवेश करा. आजही तुम्हाला शिवसेना आणि बाळासाहेब पाहिजे, पण त्यांचा मुलगा नको. कारण, ठाकरे वगळून राहिलेली शिवसेना तुम्हाला गोशाळेत बांधायची आहे,” अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदारांवर हल्लाबोल केला आहे.