मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष न्यायालयानंतर आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचला आहे. शिंदे गटाने आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला आहे. त्यानंतर शिवसेना पक्ष संघटनेवरील बहुमत येत्या ८ ऑगस्टपर्यंत सिद्ध करा, असे निर्देश निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. निवडणूक आयोगाच्या या निर्देशानंतर आता उद्धव ठाकरेंनी भर सभेत शिवसैनिकांना दोन गोष्टी महत्त्वाच्या मागितल्या आहेत. जास्तीत जास्त सदस्य नोंदणी झाली पाहिजे. तसेच मला सर्व पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे हवी आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. ते मुंबईत शिवसैनिकांना संबोधित करत होते.

हेही वाचा >>> “वडील आणि पक्ष चोरायला निघाले, तुम्ही मर्द नव्हे तर दरोडेखोर” उद्धव ठाकरेंनी केले शिंदे गटाला लक्ष्य

“सध्या न्यायालयात खटला सुरु आहे. मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. पण आता त्यांनी आम्हीच खरी शिवसेना आहोत, असे निवडणूक आयोगाला सांगितले आहे. या कारस्थानाला नुसत्या जल्लोषाने उत्तर देऊन चालणार नाही. त्यासाठी आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. पहिली म्हणजे आपल्या पदाधिकाऱ्यांचे शपथपत्र द्यावे लागेल. मला प्रत्येकाचे शपथपत्र हवे आहे. मी पक्षप्रमुख आहे. माझ्यासह गटप्रमुख ते सर्व पदाधिकाऱ्यांचे मला शपथपत्रे हवी आहेत. त्यानंतर जास्तीत जास्त सदस्यनोंदणी झाली पाहिजे. मला सदस्यनोंदणीच्या अर्जाचे गठ्ठेच्या गठ्ठे हवे आहेत. काही दिवसानंतर माझा वाढदिवस आहे. मला पुष्पगुच्छ नको आहेत. मला सदस्यांच्या अर्जाचे आणि पदाधिकाऱ्यांच्या शपथपत्रांचे गठ्ठे हवे आहेत,” असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले.

हेही वाचा >>> “छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत, अवमान सहन करणार नाही.” ‘तो’ व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विनोद पाटलांचा इशारा

“बिकाऊ असणारे सगळे गेले आहेत. आता त्यांनी वेगवेगळ्या एजन्सीज कामाला लावल्या आहेत. त्यांच्याकडे पैसा अमाप आहे. ही लढाई पैसा विरुद्ध निष्ठा अशी आहे. ही साधी माणसं माझे वैभव आहे. तुम्ही कितीही पैसा ओतलात तरी हे वैभव त्याला पुरुन उरल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“त्यांना शिवसेनेला संपवायचे आहे. पण ठाकरे आणि शिवसेना हे नाते घट्ट राहणार. तुमच्या कित्येक पिढ्या उतरल्या तरी त्यांना पाताळात गाडून आम्ही येऊ. त्यांना शिवसेना आणि ठाकरे हे नाते तोडायचे आहे. ही बंडखोरी नाही. ही हरामखोरी आहे. हा नमकहरामीपणा आहे. एवढीच मर्दुमकी असेल तर माझ्या वडिलांचा म्हणजेच शिवसेनाप्रमुखांचा फोटो लावू नका. हिंमत असेल तर स्वत:च्या नावाने मतं मागा,” असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले.