Vaishnavi Hagawane Death Case वैष्णवी हगवणेने आत्महत्या केल्याची माहिती समोर येताच महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सासू लता आणि नणंद यांना अटक केली आहे. तर फरार असलले सासरे राजेंद्र आणि दीर सुशील यांना आज अटक करण्यात आली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ‘आज सकाळी आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता, पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी ज्या गोष्टी करायच्या त्या गोष्टी पोलीस करतील.’ असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
“आज सकाळी राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी योग्य कारवाई केली आहे. पुढेही हे प्रकरण लॉजिकल एंडला नेण्यासाठी जे करायचं आहे ते पोलीस करतील. अशा प्रकारे छळ करुन आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं या गोष्टी सहन केल्या जाणार नाही. जी कठोरातली कठोर कारवाई आहे ती केली जाईल. “
आरोपींना मकोका लागणार का?
आरोपींवर मकोका लावा अशी मागणी वैष्णवीच्या आई वडिलांनी केली आहे. त्याबाबत विचारलं असता मुख्यमंत्री म्हणाले की, “मकोका लावण्यासाठी काही नियम आहेत. नियमात बसलं तर मकोका लावू शकतो. पण मकोका लागेल की नाही हे आज सांगता येत नाही. त्यावर बोलू शकत नाही.’ असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे वैष्णवी प्रकरणातील आरोपींवर मकोका लागेल की नाही अद्याप सांगता येत नाही. २१ व्या शतकात मुलींमध्ये आणि सुनांमध्ये फरक करणं आणि अशी वागणूक देणं हे गैर आहे. पोलिसांनी आता दोन आरोपींना अटक केली आहे. आता याला फाटे फोडणं गैर आहे.” असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
१६ मे रोजी वैष्णवी हगवणेची आत्महत्या
पुण्यातील मुळशी तालुक्यातील भुकूम येथे १६ मे २०२५ रोजी वैष्णवी शशांक हगवणे या २३ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैष्णवी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून होती. वैष्णवीच्या मृत्यूमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. लग्नाच्या वेळी ५१ तोळे सोने, एक फॉर्च्युनर कार आणि इतर महागड्या वस्तू दिल्या गेल्या होत्या. पण नंतरही वैष्णवीकडून आणखी पैशांची मागणी करण्यात आली आणि तिला घरातूनही बाहेर काढण्यात आलं होतं. वारंवार होणारा छळ सहन न झाल्याने तिने आत्महत्या केली. वैष्णवी आणि शशांक यांचा प्रेमविवाह झाला होता. तिच्या लग्नाला तिच्या वडिलांनी विरोध दर्शवला होता. मात्र वैष्णवीने शशांकशीच लग्न करायचं असा हट्ट धरला होता.