दक्षता आणि संनियंत्रण समितीची त्रमासिक बैठक नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात पार पडली. या बैठकीत ग्रामीण आरोग्य, ग्रामीण स्वच्छता, महिला सक्षमीकरण, पेयजल योजना, पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत जिल्ह्य़ात करण्यात आलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला रायगडचे खासदार अनंत गिते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या विविध योजनांमार्फत जिल्ह्य़ात राबवण्यात येणाऱ्या कामाची परिस्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी सांगितले.
पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात नवीन रस्त्याबरोबरच जुन्या रस्त्याचे पुनर्बांधणी आणि मजबुतीकरण करणेही शक्य होणार आहे. केंद्र सरकारने योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी २१ हजार कोटींची तरतूद केली आहे. देशातील केवळ चार राज्यांतच ही योजना राबवली जाणार आहे. यात महाराष्ट्राचा समावेश आहे. त्यामुळे राज्यात ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात रस्त्याची कामे हाती घेता येणार आहेत. जिल्हा प्रशासनाला याबाबतचा आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे अनंत गिते यांनी स्पष्ट केले. गेल्या आर्थिक वर्षांसाठी जिल्हा प्रशासनाने १०५ कोटींचा आराखडा तयार होता. मात्र यात अपग्रेडेशनची कामे अधिक असल्याने ही कामे होऊ शकली नव्हती. आता मात्र ही कामे होऊ शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय आरोग्य अभियानात जिल्ह्य़ात सर्वाधिक काम रायगड जिल्ह्य़ात झाले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. इंदिरा आवास योजनेसाठी जिल्ह्य़ाला देण्यात आलेल उद्दिष्ट पूर्ण होत आल्याचे खासदार गीते यांनी स्पष्ट केले. जिल्ह्य़ात १३४ नवीन पेयजल योजनांची कामे हाती घेतली जाणार असून जिल्हा लवकरच टंचाईमुक्त होईल असा विश्वास त्यांनी केली. जिल्ह्य़ात अनेक पेयजल योजनांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप होत आहेत. शासनाच्या निर्णयानुसार ही कामे पूर्ण करावी लागतील. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या योजनांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे गिते यांनी स्पष्ट केले.
पाणलोट विकास कार्यक्रमाअंतर्गत गेल्या वर्षी जिल्ह्य़ात २ कोटी ७० लाख रुपयांची कामे करण्यात आली असून कर्जत आणि पोलादपूर तालुक्यांची यासाठी निवड करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.