हेटवणे धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळावे यासाठी रायगडातील शेतकऱ्यांनी पदयात्रा काढली होती. या पदयात्रेनंतर हेटवणे सिंचन क्षेत्रात येणाऱ्या गावांना सिंचनासाठी पाणी देण्याची मागणी मान्य करण्यात आली. ही बाब लक्षात घेऊन कोढाणे धरणाचे काम पूर्ण व्हावे यासाठी कर्जत परिसरातील शेतकऱ्यांनी पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. १ एप्रिलपासून या दिंडीला सुरुवात होणार आहे. धरण आहे पण शेतीला पाणी नाही, ही हेटवणे धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांची व्यथा, तर धरणाचे काम सुरू झाले मात्र ते पूर्ण होत नाही ही कोंढाणे धरण परिसरातील शेतकऱ्यांची व्यथा. शेतकऱ्यांची ही व्यथा शासनाला कळावी यासाठी रायगडातील शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. हेटवणे धरणाच्या पाण्यासाठी करण्यात आलेला लाँगमार्च यशस्वी झाल्यानंतर आता कोंढाणे धरणासाठी शेतकरी लाँगमार्च करणार आहेत.
कर्जत तालुक्यातील कोंढाणे परिसरात १९८४ सालापासून धरण प्रस्तावित होते. मात्र २००५ म्हणजेच २० वर्षांत धरणाच्या कामाबाबत कुठलीच हालचाल झाली नाही. आमदार सुरेश लाड यांच्या पाठपुराव्यानंतर धरणाच्या कामाला सुरुवात झाली. मात्र धरणाचे काम सुरू असतानाच धरणाची उंची वाढवण्याची मागणी आमदार लाड यांनी केली. कारण धरणाची उंची वाढवली तर धरणाच्या पाणीसाठय़ात तिप्पट वाढ होणार होती. मात्र धरणाची उंची वाढवल्याने धरणाच्या किमतीतही मोठी वाढ झाली. मुंबईतील काही बडय़ा उद्योजकांच्या जमिनी या धरणात जाण्याची भीती निर्माण झाली, धरणाच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप करण्यात आले, न्यायालयात याचिका दाखल झाल्या आणि यामुळे वीस वर्षांनंतर सुरू झालेले कोंढाणे धरणाचे काम पुन्हा एकदा बंद पडले.
धरणाचे काम पुन्हा सुरू व्हावे यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी अनेक आंदोलन केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. अखेर हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आता कर्जत ते मुंबई अशी पायी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १ एप्रिलला या पायी दिंडीची सुरुवात होणार असून, ४ एप्रिलला ही दिंडी मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावर धडकणार आहे. या पाश्र्वभूमीवर कोंढाणे धरण कृती समितीच्या वतीने कर्जतमधील दहिवली इथे एका सभेच आयोजन करण्यात आले होते. या सभेला आमदार सुरेश लाड, सिडकोचे संचालक वसंत भोईर, तालुकाध्यक्ष एकनाथ धुळे, माजी नगराध्यक्ष शरद लाड उपस्थित होते. या पायी दिंडीत शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आमदार लाड यांनी केले.
संग्रहित लेख, दिनांक 31st Mar 2013 रोजी प्रकाशित
रायगडातील शेतकरी काढणार कोंढाणे धरणासाठी पायी दिंडी
हेटवणे धरणाचे पाणी सिंचनासाठी मिळावे यासाठी रायगडातील शेतकऱ्यांनी पदयात्रा काढली होती. या पदयात्रेनंतर हेटवणे सिंचन क्षेत्रात येणाऱ्या गावांना सिंचनासाठी पाणी देण्याची मागणी मान्य करण्यात आली.
First published on: 31-03-2013 at 03:03 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Walking rally of raigad farmer for kondhane dam