विधानसभेनंतर लोकसभेतही दारूण पराभवाची नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली. तब्बल २ लाख ३४ हजारांची दणदणीत आघाडी घेत शिवसेनेचे प्रा. रवींद्र गायकवाड यांनी मिळविलेला विजय राष्ट्रवादीच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यांच्यावर नव्याने आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली. स्थानिक प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष व मोदी लाट याचा परिणाम या निवडणुकीत दिसून आला.
जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादीचे वर्चस्व असले तरी शिवसेनेने लोकसभेवर आपली पकड निर्माण केली होती. सलग ३ वेळा विजय संपादन केल्यानंतर हा मतदारसंघ गत वेळी पुन्हा डॉ. पाटील यांनी आपल्याकडे खेचून आणला. या वेळी मागचीच पुनरावृत्ती होणार, असे चित्र होते. त्यामुळे सर्व आलबेल असल्याच्या अविर्भावात राष्ट्रवादीची मंडळी होती. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी मतदारसंघ िपजून काढत वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला होता. त्याचा कसलाही परिणाम मतदारांवर झाला नसल्याचेच निकालावरून स्पष्ट झाले.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेस व शिवसेना-भाजप एकत्र आहेत. लोकसभेच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्र आल्याचे चित्र निर्माण केले गेले. प्रत्यक्षात मात्र या दोघांमधील मतभेद लपून राहिले नसल्याने अनेक काँग्रेसजनांनी सेनेचा जाहीर प्रचार करून राष्ट्रवादीला जणू आव्हानच दिले. रिंगणात उमेदवारांची संख्या मोठी होती. त्यामुळे विरोधी मतांचे विभाजन होऊन राष्ट्रवादीलाच यश मिळणार, असा अंदाज बांधला गेला. मात्र, अपक्षांची झोळी रिकामीच राहिली. ही मते थेट शिवसेनेच्या खात्यात जमा झाली. परिणामी मोठय़ा फरकाने पराभवास सामोरे जाण्याची वेळ राष्ट्रवादीवर आली.
राष्ट्रवादीची प्रचारयंत्रणाही कितपत प्रभावी काम करीत होती, याचाही विचार करण्याची गरज पक्षातीलच काहीजण व्यक्त करीत आहेत. राष्ट्रवादीची प्रचारयंत्रणा नेहमीच शिस्तबद्ध राबविली जात असे. या वेळेसही तसे चित्र असले, तरी प्रत्यक्षात अपक्षांच्या मतविभाजनाचा थेट फायदा आपणाला होणार, या आशेवर बिनधास्त असलेल्या राष्ट्रवादीला मतदारांनीच मोठा धक्का दिला. अपक्षांमधील सर्वावरच अनामत जप्तीची नामुष्की ओढवली. आगामी विधानसभा निवडणुकीवर लोकसभेचे पडसाद उमटण्याची चिन्हे असल्याने राष्ट्रवादीला हा इशाराच आहे.