Raj Thackeray Election 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज अमित ठाकरे यांच्या मतदारसंघात जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तसंच, अमित ठाकरेंच्या उमेदवारीबाबत संवाद साधला. दरम्यान, अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले असताना राज ठाकरेंना निवडणूक का लढवावी वाटत नाही, याचा एक प्रसंग त्यांनी आज जाहीर सभेत सांगितला.

“बाळासाहेब ठाकरे किंवा माझ्या वडिलांनी कोणती गोष्ट करा अथवा करू नका, असं मला कोणीच सांगितलं नाही. त्यामुळे मीही माझ्या मुलाला काही सांगत नाही. त्याला निवडणुकीला उभं राहावं वाटलं तर त्याने राहावं, नाहीतर नाही. पण निवडणुकीत उतरावं असं मला वाटत नाही. कारण, मी ज्या मुशीतून वर आलोय, त्यामुळे मला असं काही वाटत नाही:, असं राज ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंबरोबरचा एक प्रसंगही सांगितला.

हेही वाचा > Raj Thackeray in Borivali : राज ठाकरेंना भर सभेत आला कॉल, मुंबईतील एक सभा अचानक रद्द; नेमकं काय झालं?

बाळासाहेबांनी नाकारली होती लाल दिव्याची गाडी

राज ठाकरे म्हणाले, “१९७४ सालची गोष्ट आहे. आमचे माने नावाचे वाहनचालक आले नव्हते. त्यावेळी शिवेसना भवन नव्हतं. वांद्र्याला ब्लू पल नावाची इमारत होती, तेथील पहिल्या मजल्यावर एक छोटीशी खोली होती. तेच शिवसेनेचं ऑफिस होतं. मी आणि बाळासाहेब कार्यालयात जायला निघालो. तेवढ्यात तत्कालीन महापौर सुधीर जोशी आले. त्यांची इम्पाला मोठी लाल दिव्याची गाडी होती. त्यांना बाळासाहेबांशी बोलायचं होतं. त्यांचं बोलून झाल्यावर बाळासाहेब बाहेर आले. तेवढ्यात सुधीरभाऊंनी विचारलं कुठे जाताय? मी सोडतो. तर बाळासाहेब म्हणाले, तुमचे दिवे तुमच्यापाशी राहुदेत. मी नाही तुमच्या दिव्याच्या गाडीत बसणार.”

“मी हे सगळं ऐकत होतो आणि मग आम्ही टॅक्सीत बसलो. टॅक्सी सुरू झाली. वांद्र्याच्या ब्रिजवर असताना मी मागे वळून पाहिलं तर एका टॅक्सीच्या मागे लाल दिव्याची गाडी होती. तो लाल दिवा ज्याच्यामुळे होता, ती व्यक्ती माझ्या शेजारी बसली होती. आता मला सांगा हे चित्र ज्या मुलाने पाहिलं असेल त्याला खुर्चीचा सोस असेल का?”, असं राज ठाकरे म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंनी मोडले सिग्नल्स

दरम्यान, राज ठाकरेंची आज मुंबईत तीन ठिकाणी सभा होती. परंतु, ट्राफिकमुळे वर्सोव्यात जाणं शक्य न झाल्याने त्यांनी तेथील सभा रद्द केली अन् बोरिवलीतून थेट माहिम गाठलं. परंतु, माहिमला येताना त्यांना सर्व सिग्नल्स तोडून यावं लागलं, असं ते माहिमकरांना संबोधित करताना म्हणाले.