शांत समुद्र कुशल खलाशी बनवत नाही. उत्तम खलाशी होण्यासाठी खवळलेल्या समुद्रातच प्रशिक्षण घेतले पाहिजे, कारण, प्रवास करताना समुद्र नेहमीच शांत असेल असे नाही. मग जर कधी अशांत समुद्रातून इच्छितस्थळी जाण्याची वेळ आली तर आपला टिकाव लागणार नाही. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तशा प्रसंगातून जाणं आवश्यक असतं तेच आपल्याला नवनवीन धडे शिकवत असतात. सुनील आणि सविता या भावंडांच्या आधीच्या पिढ्यांनी भरपूर संपत्ती मागे ठेवली होती, त्यामुळे दोघांचे बालपण अगदी ऐषारामात गेले होते. जे मागतील ते समोर हजर व्हायचे. कधी कशाची कमतरता, उणीव आई-वडिलांनी भासू दिली नाही. शेती, कारखाने, सावकारी या सगळ्यांतून पैशाचा ओघ कायम सुरू असायचा. मुलांना गरिबी हा शब्दच माहीत नव्हता. वर्षातून एकदा परदेशवारी व्हायची. मौजमजेचे दिवस होते. पण त्याचवेळी अभ्यासाकडे दुर्लक्षच होत आहे, त्याची गरज आहे, हे कुणाच्या गावीही नव्हतं म्हणजे शिक्षणाची जरूर आहे हा विचारही कोणी केला नव्हता. त्यामुळे शिक्षणाच्या नावाने शंख होता. हळूहळू दिवस बदलत होते. सावकारीवर बंदी आली. कुळकायदे आले. थोडी शेती गेली. शेतीतील ज्ञान नसल्याने उत्पन्न कमी झाले. कारखाने नोकरांच्या जिवावर चालायचे, आता पूर्वीप्रमाणे प्रामाणिक नोकर मिळेनासे झाले. नुकसान होऊ लागले. साठवलेली गंगाजळी किती दिवस पुरणार? सुनील तर कावराबावरा झाला. त्यातच वडील गेले. सविताचे लग्न झाले, त्यात परत वारेमाप खर्च झाला. जुना वाडा, नोकरचाकर काढून टाकले. आता पैसे कमाविण्याकरिता हातपाय मारले पाहिजेत, पण कुठे आणि कसे? नशिबाने थोडी साथ दिली. जिच्याशी प्रेमविवाह केला, तिला परिस्थिती जाणीव होती. कष्ट केले पाहिजेत, सुनीलला कामाची सवय लावली पाहिजे, हे ओळखून तिने बँक कर्ज, उधारी यातून भांडी, काचसामान याचे दुकान स्वत:साठी, तयार कपडय़ांचे दुकान सुनीलसाठी सुरू केले. दुकान वेळेवर उघडणे, होलसेल बाजारातून खरेदी, हिशेब, ग्राहक सांभाळणे सुनीलला फार अवघड होत असे. बायकोचे कष्ट पाहून लाज वाटे, हुरूपही येई. फार सुखासीन दिवस काढले, शिक्षण अर्धवट सोडले ते आता नडते आहे. तरी स्वकमाईचा आनंद मोठा होता. हळूहळू सगळे सावरले. गेलेले वैभव परत येणे अवघड होते. पण, परिस्थितीशी झगडून वाट तरी सुकर करता आली. सविताच्या सासरी श्रीमंती होती. घरातील प्रत्येक व्यक्ती काम करायची. तिला सवय नसल्यामुळे ते कठीण वाटे. पण सासूबाई समजून सांगायच्या, “अगं, आज सगळं व्यवस्थित आहे, उद्या असंच असेल याची खात्री नाही. कामाची, कमी पैसे खर्च करण्याची सवय केव्हाही चांगलीच. कंजुषी करू नका आणि उधळमाधळही करू नका. फार आरामाचे आयुष्य कायम मिळेलच असे नाही. येणाऱ्या वाईट दिवसांना, खराब हवामानाला यशस्वीपणे तोंड देण्याची तयारी हवीच.” एकूण काय, कुशल खलाशी होण्यासाठी खवळलेल्या सागरातही सफर केलीच पाहिजे. गीता ग्रामोपाध्ये geetagramopadhye@yahoo.com