झी मराठी वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय कार्यक्रमावर आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेने आक्षेप घेतला आहे. या कार्यक्रमातील एका भागात आगरी पात्र चुकीच्या पद्धतीने रंगवल्याने आपल्या समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना लेखी पत्र लिहून त्यांनी ही तक्रार केली आहे.

५ आणि ६ नोव्हेंबर रोजी प्रसारित झालेल्या या कार्यक्रमाच्या भागात आगरी पात्र दाखवण्यात आलं होतं. याच विनोदी पात्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. आगरी पात्राद्वारे विनोद निर्मिती करणे चुकीचं नाही. पण आगरी पात्राद्वारे आगरी समाजावर चुकीची टीका टीप्पणी करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असं मत आगरी- कोळी भूमीपुत्र संघटनेनं व्यक्त केलं.

आगरी समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी येत्या सात दिवसांत कार्यक्रमात जाहीर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल अशा इशारा या पत्रातून देण्यात आला आहे. आता वाहिनी आणि कार्यक्रमाच्या निर्मात्यांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.