आमिर खान आणि जुही चावला ही बॉलिवूडमधली त्याकाळची सुपरहिट जोडी. 'कयामत से कयामत तक', 'हम हे राही प्यार के', 'लव्ह लव्ह लव्ह', 'इश्क' यांसारख्या चित्रपटातून दोघांनी एकत्र काम केलं. मात्र रुपेरी पडद्यावरची ही हिट जोडी तब्बल सात वर्षे एकमेकांसोबत अबोला धरून होती. किरकोळ वादामुळे आम्ही दोघंही एकमेकांशी त्यावेळी तब्बल सहा- सात वर्षे बोलत नव्हतो हे आमिरनं एका मुलाखतीत मान्य केलं. 'इश्क' चित्रपटाच्या सेटवर माझ्यात आणि जुहीमध्ये एका किरकोळ कारणावरून वाद झाला. या वादामुळे माझ्या आणि तिच्या मैत्रीत फूट पडली. तिच्याशी मी कधीही न बोलण्याचा निर्णय घेतला. तिच्याशी मी तेव्हा असं का वागलो हे मला अजूनही कळलं नाही. ती माझ्या बाजूला आली तरी मी लांब पळायचो. त्या भांडणानंतर इश्कच्या सेटवर कामाव्यतिरिक्त आम्ही क्वचितच बोलायचो, असा किस्सा आमिरनं सांगितला. 'मी पत्नी रिनाशी घटस्फोट घेत असल्याचं तिला समजलं त्यावेळी तिनं मला सहा सात वर्षांनंतर पहिल्यांदा फोन केला होता. ती माझी आणि रिनाची चांगली मैत्रीण होती. आमचा संसार मोडू नये हा तिचा प्रयत्न होता. मी तिचा फोन उचणार नाही हे माहिती असूनही केवळ काळजीपोटी तिनं मला फोन केला आणि भेटायला बोलावलं होतो. आता मी आणि जुही फार बोलत नसलो तरी आमच्यामध्ये मैत्री अजूनही कायम आहे असं म्हणत आमिरनं त्या वेळच्या आठवणी जागवल्या.