एकानंतर एक बॉक्स ऑफीसवर दणक्यात आपटलेल्या चित्रपटानंतर अभिनेता रणबीर कपूरला त्याच्या आगामी ‘संजू’ या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. चित्रपटाचा ट्रेलर, पोस्टर्स पाहून रणबीरच्या करिअरची विस्कटलेली घडी पुन्हा एकदा बसेल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित या बायोपिकमध्ये आमिर खानलाही भूमिका साकारण्याची इच्छा होती.

या चित्रपटाचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ज्यावेळी आमिरला कथेविषयी सांगितलं तेव्हा त्याने भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी संजय दत्तचे वडील सुनील दत्त यांची भूमिका हिरानी यांनी देऊ केली होती. मात्र, आमिरने या भूमिकेला नकार दिला.

‘आऊटलूक’ला दिलेल्या मुलाखतीत यासंदर्भात राजकुमार हिरानी सांगतात की, ‘आमिर माझा खूप चांगला मित्र आहे. मी ज्या पटकथा लिहितो किंवा ज्या कथा माझ्या डोक्यात असतात, त्या सर्व मी त्याला सांगतो. ‘संजू’ची कथा मी त्याला जेव्हा सांगितली तेव्हा ती त्याला खूप आवडली. मैं भी कुछ करता हूँ असं म्हणत त्याने काम करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा मी सुनिल दत्त यांची भूमिका साकारण्यासाठी त्याला विचारलं. पण त्यावेळी म्हणजे २०१६ मध्ये तो ‘दंगल’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र होता. वयस्कर वडिलाची भूमिका तो त्यात साकारत होता, त्यामुळे त्याने नकार दिला.’

वाचा : या दमदार संवादांमुळे गाजतोय ‘राजी’; गल्ला ६० कोटींवर 

डिसेंबर २०१६ मध्ये ‘दंगल’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्याचवेळी ‘संजू’च्या शूटिंगला सुरुवात झाली. आमिरच्या जागी आता परेश रावल सुनील दत्त यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. २९ जून रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून संजूबाबा आणि रणबीर या दोघांचेही चाहते त्यासाठी उत्सुक आहेत, यात काही शंकाच नाही.