कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. कपिलसोबतच्या वादानंतर सुनीलने ‘द कपिल शर्मा शो’ सोडला आणि त्यानंतर कपिलचा वाईट काळ सुरू झाला. कपिलने बऱ्याचदा वाद विसरून सुनीलशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळालं नाही. ब्रेकनंतर कपिलने पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन केलं तेव्हा सुनील त्याच्यासोबत असेल अशी चाहत्यांची अपेक्षा होती. सुनीलने नकार दिल्याचं कळताच चाहत्यांचाही हिरमोड झाला. अखेर वर्षभराच्या वादावादीनंतर सुनील आणि कपिल पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याचं कळतंय.

सुनीलचा महिन्याभरापूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘कानपूरवाले खुरानास’ हा शो बंद होण्याच्या मार्गावर आहे. कारण फक्त आठ आठवड्यांसाठीच त्याने हा शो साइन केला होता. ‘माझ्या हातात जितका वेळ होता, तितकाच वेळ मी या शो ला देऊ शकलो. ‘भारत’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान माझ्याकडे महिनाभराचा वेळ होता. त्यामुळे हा वेळ मी सत्कारणी लावला,’ असं त्याने म्हटलं होतं. ‘आयबीटी’ने दिलेल्या वृत्तानुसार ‘भारत’चे शूटिंग पूर्ण होताच सुनील ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परतणार असल्याचं कळतंय.

वाचा : ‘उरी’ची घोडदौड कायम; पाच दिवसांत ५० कोटींहून अधिक कमाई

सुनीलसाठी माझ्या शोचे दार नेहमीच खुले असल्याचं कपिलने आधीच स्पष्ट केलं होतं. इतकंच नव्हे तर सलमान खाननेही सुनील आणि कपिलला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे कपिलच्या शोमध्ये सुनील परतल्यास चाहत्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ठरेल.