२० एप्रिल २००७ रोजी विवाहबंधनात अडकलेल्या ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्याकडे बॉलिवूडमधील सर्वात सुंदर जोडी म्हणून पाहिलं जातं. या जोडीने लग्नानंतर फार कमी चित्रपट एकत्र केले. मात्र ही जोडी पुन्हा एकत्र दिसावी अशी अभी- अॅशच्या चाहत्यांची प्रचंड इच्छा होती. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार असल्याचं दिसून येत आहे.

‘टाईम्स ऑफ इंडियानुसार’, अॅश-अभीने २०१० मध्ये आलेल्या रावण या चित्रपटामध्येही स्क्रिन शेअर केली होती. त्यानंतर ही जोडी पुन्हा एकत्र दिसली नाही. मात्र आता तब्बल आठ वर्षांनंतर ही जोडी एकत्र स्क्रिन शेअर करणार असून त्यांच्या आगामी चित्रपटाचं नाव ‘गुलाब जामुन’ असल्याचं सांगण्यात येत आहे.

‘गुलाब जामुन’ हा चित्रपट अनुराग कश्यपच्या प्रोडक्शनअंतर्गत तयार करण्यात येणार असून सर्वेश मेवारा या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या चित्रपटाची घोषणा लवकरच करण्यात येणार असून चित्रपटाची कथा आवडल्यामुळे अॅश-अभीने त्यांचा होकार कळविला आहे.

दरम्यान, अॅश-अभीने ‘कुछ ना कहो’, ‘गुरु’, ‘रावण’ या चित्रपटामध्ये एकत्र काम केलं आहे. ऐश्वर्या सध्या तिच्या आगामी ‘फन्ने खा’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून हा चित्रपट येत्या ३ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये ती एका रॉकस्टारच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये अनिल कपूरदेखील स्क्रिन शेअर करणार आहे.