बॉलिवूडच्या सर्वांत सुंदर अभिनेत्रींमध्ये ऐश्वर्या राय बच्चनचं नाव आवर्जून घेतलं जातं. सौंदर्याची खाण असलेल्या ऐश्वर्याने १९९४ साली 'मिस वर्ल्ड'चा किताब पटकावला होता. या सौंदर्यस्पर्धेत अंतिम फेरीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं विचारपूर्वक उत्तर देऊन ऐश्वर्याने परीक्षकांची मनं जिंकली होती. 'मिस वर्ल्ड' होण्यासाठी केवळ सुंदरताच नाही तर कुशाग्र बुद्धिमत्ता व हजरजबाबीपणाही महत्त्वाचा असतो, हे ऐश्वर्याने सिद्ध केलं होतं. ऐश्वर्याच्या वाढदिवसानिमित्त तिचा 'मिस वर्ल्ड' सौंदर्यस्पर्धेतला अंतिम फेरीचा व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ''मिस वर्ल्डमध्ये कोणते गुण असायला हवेत'', असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. त्यावर ऐश्वर्याने क्षणाचाही विलंब न करता अत्यंत विचारपूर्वक उत्तर दिलं. ती म्हणाली, ''आतापर्यंत आपण जितके मिस वर्ल्ड पाहिली आहेत, त्या सर्वांमधील क्षमाभाव हा गुण अधोरेखित झाला. केवळ दर्जा असलेल्या आणि ठराविक उंचीवर पोहोचलेल्या लोकांसाठी नाही तर वंचितांसाठीही क्षमाभाव असायला हवा. राष्ट्रीयत्व आणि वर्ण या चौकटींबाहेर जाऊन माणुसकीचा विचार करणारे बरेच लोक आपण पाहिले आहेत. या चौकटींपलिकडे पाहणं गरजेचं आहे आणि अशी व्यक्तीच खऱ्या अर्थाने मिस वर्ल्ड होऊ शकते.'' आणखी वाचा : ..म्हणून सलमान- ऐश्वर्याचे लग्न होऊ शकले नाही या सौंदर्यस्पर्धेत ८७ देशांमधून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यावेळी ऐश्वर्या २१ वर्षांची होती आणि स्थापत्यशास्त्राचं शिक्षण घेत होती.